मुंबई – राज्यातील डबल इंजिन सरकार आता तीन चाकी झाले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा असे तीन चाकी सरकार सत्तेवर असून यामुळे शिंदे गटातील आमदारांची कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेक आमदार स्वगृही परतणार आहेत, असा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
विनायक राऊत म्हणाले, राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही रखडला असून यात आता राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांची भर पडल्याने विस्तारात आता आणखी वाटेकरी आले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील किती आमदारांना मंत्रिपदे मिळणार हे पाहावं लागणार आहे.
राज्यात गलिच्छ आणि घाणेरडे राजकारण सुरू आहे. यामुळे महाराष्ट्राची देशात बदनामी होत आहे. यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला. यासाठी श्रीपाद डांगे, आचार्य आत्रे यांसारख्या थोर नेत्यांचे योगदान लाभले. त्या संयुक्त महाराष्ट्राला कुटुंब फुटीचा काळिमा लागला आहे. एवढंच नव्हे तर कुटुंब फुटल्यानंतर एकमेकांवर घाणेरडे आरोप-प्रत्यारोप केले जातात. याकडे जनता तुच्छतेने पाहत आहे, असे विनायक राऊत म्हणाले.
अजित दादा आणि कंपनीने तिथे (शिंदे-भाजपा सरकारमध्ये) उडी मारली, त्याचदिवशी शिंदे गटातील आमदारांनी चळवळ करायला सुरुवात केली आहे. त्यांचा होत असलेला उद्रेक आणि तो थांबवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्रेधातिरपीट पाहिल्यानंतर खूप दयनीय अवस्था झालेली आहे. त्यानंतर खूप जणांनी आता आम्ही ज्या घरात होतो तेच बरं आहे. आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीने साद घातली तर आम्ही नक्कीच त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, अशी वक्तव्य काही आमदारांकडून होत असल्याचे राऊत यांनी सांगितले.