नवी दिल्ली -कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. कसोटीच्या काळात कॉंग्रेस पक्ष ठामपणे पवार यांच्या पाठिशी उभा असल्याचा संदेश त्या भेटीतून दिला गेला आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा स्वीकारत अजित पवार यांनी बंड केले. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे.
एवढेच नव्हे तर, अजित पवार आणि त्यांचा गट पक्षावर ताबा मिळवण्यासाठी सक्रिय झाला आहे. त्यामुळे पक्ष स्वत:कडे कायम ठेवण्याच्या इराद्याने शरद पवार ऍक्शने मोडमध्ये आले आहेत. त्यातून त्यांनी देशाच्या राजधानीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्या बैठकीनंतर पवार यांच्या 6 जनपथ निवासस्थानी राहुल दाखल झाले.
त्यांच्या भेटीत झालेल्या चर्चेचा तपशील तातडीने समजू शकला नाही. पण, कॉंग्रेस आपला हात सोडणार नसल्याचे पवार यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी ती भेट महत्वाची मानली जात आहे. राष्ट्रवादीत फूट पडली त्या दिवशीच राहुल आणि कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पवार यांना फोन करून पाठिंबा दर्शवला. त्यानंतर मुंबईत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्या पक्षाच्या इतर नेत्यांनी पवार यांची भेट घेतली होती.
शरद पवार यांचे राजकीय महत्व कॉंग्रेस जाणून आहे. त्यातून त्यांच्या पॉवरचा अधिकाधिक वापर करून घेण्याचा मुत्सद्दीपणा कॉंग्रेस दाखवत असल्याचे सूचित आहे. वर्षभरापेक्षा कमी कालावधी उरलेल्या पुढील लोकसभा निवडणुकीसाठी देश पातळीवर एकवटण्याच्या हालचाली विरोधी पक्षांच्या गोटात सुरू आहेत.
विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांत कॉंग्रेसनेही पुढाकार घेतला आहे. मात्र, काही विरोधी पक्ष आणि कॉंग्रेसमधील संबंध अद्यापही आलबेल नाहीत. अशावेळी त्या विरोधी पक्षांपर्यंत पोहचण्याची जबाबदारी पवार प्रभावीपणे हाताळू शकतात, असे कॉंग्रेसला वाटत असल्याचे त्या पक्षातील सुत्रांनी नमूद केले.
लोकसभा जागांच्या संख्येचा विचार करता उत्तरप्रदेशनंतर देशात दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाराष्ट्र कळीचे राज्य ठरेल. त्याशिवाय, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकही सव्वा वर्षावर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जाण्याची आग्रही भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे.
त्यासाठी शरद पवार यांची पॉवर मोलाची ठरेल, असे कॉंग्रेसचे आडाखे आहेत. पवार हे निर्विवादपणे जनाधार असणारे महाराष्ट्रातील अव्वल नेते आहेत. त्यामुळे ते महाविकास आघाडीसाठी प्रभावी स्टार प्रचारक ठरतील, असाही कॉंग्रेसचा कयास आहे.