– अजित पवारांसह 11 जणांची हकालपट्टी
– राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव मंजूर
नवी दिल्ली/ मुंबई :- “पक्षावर कोणीही दावा करू द्या, कोणीही काहीही बोलत असेल त्याला काही तथ्य नाही, आज दिल्लीत झालेल्या बैठकीत 11 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचा मी एकमेव अध्यक्ष आहे. त्यामुळे आम्हाला निवडणूक आयोगात योग्य तो न्याय मिळेल,’ असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केला. तसेच, “जर तसे झाले नाही तर आम्ही आयोगा व्यतिरिक्त अन्य संस्थांकडून जाऊ,’ असे म्हणत पवारांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचेही संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत दोन खासदार आणि नऊ आमदारांचे निलंबन करण्यात आले. दोन खासदारांमध्ये प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीच्या या बैठकीला 27 राज्यांतील कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीत, राष्ट्रीय समितीने एकूण 8 ठराव मंजूर केले आहेत. “विचारधारा सोडून जे लोक बाहेर पडले आहेत. त्यांचा सर्व कार्यकारिणीने विरोध केला आहे,’ असेही पवारांनी यावेळी म्हटले आहे.
वयाचा काही फरक पडत नाही…
राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्हाच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे पवारांनी सांगतानाच निवृत्तीबाबत प्रश्नाबाबदही उत्तर दिले. “वय 82 असो वा 92, वयाने फरक पडत नाही. मी पक्षाची पुनर्बांधणी करेन. कुणाला (अजित पवार) मुख्यमंत्री व्हायचे असेल तर आम्हाला काहीच अडचण नाही. माझ्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत,’ असेही शरद पवारांनी म्हटले. पवारांच्या आधी राष्ट्रवादीचे नेते पी.सी. चाको यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.
2019 ला पत्र दिले होते…
शरद पवार यावेळी म्हणाले, एक गोष्ट खरी आहे की, 2019 मध्ये काही लोकांनी त्यांच्या सह्यांचे एक पत्र दिले होते. त्यात पक्षाचे पुढील धोरण काय असावे? कुणाबरोबर युती करावी? यावर चर्चा करण्याची गरज आहे, असे म्हटले होते. त्यावर मी बैठक बोलावावी असेही म्हटले होते. मात्र, नंतर पुढे निवडणूक आली आणि त्यावर काहीही चर्चा झाली नाही.
2024 महाराष्ट्रात चित्र बदलेल..
“2024 मध्ये महाराष्ट्राचे चित्र बदलले असेल. कारण, तपास यंत्रणांचा वापर करून ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. त्याला देशातील जनता नक्की नाकारेल. द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना निवडणूकीत चफराक बसल्याशिवाय राहणार नाही. ईडी, सीबीआय यासह अन्य संस्थांद्वारे विविध राज्यात विरोधकांवर दबाव आणला जात आहे. परंतू यामुळे लोकांच्या मनात सरकारबद्दल नाराजी पसरत आहे,’ असेही पवार म्हणाले.