नवजात स्वतंत्र राष्ट्रांचे भारतानेच नेतृत्व केले ,मलायन पंतप्रधानांचा गौरव
कौलालंपूर, ता. 8 – आशियातील गुलामगिरीविरुद्ध भारतीय नेत्यांनी प्राणपणाने बंड उभारले. आशियातील नवजात स्वतंत्र राष्ट्रांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व भारतानेच केले, असा गौरव मलायाचे पंतप्रधान टंकू रहमान यांनी भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना दिलेल्या खान्याचे प्रसंगी बोलताना केला.
ते म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामानेच आशियाई राष्ट्रांना जागृत केले. आधुनिक जगाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा भारताच्या या कार्याची महती उपेक्षिता येणार नाही. मलायन नेत्यांनी लोकशाही संकेतांना डावलून काही गोष्टी केल्या पण त्या देश रक्षणाच्या व स्वातंत्र्य रक्षणास आवश्यक म्हणून केल्याचे सांगून ते म्हणाले, काही झाले तरी आम्ही लोक लोकशाही तत्त्वांनाच उचलून धरू. आमचे व्यक्तिमत्त्व व जीवनपद्धती अबाधित राखून भारताप्रमाणेच पार्लमेंटरी लोकशाहीचा आचार करू.
रेल्वेसांखळी ओढल्यास कैदेची शिक्षा
नवी दिल्ली – रेल्वेची सांखळी अकारण ओढल्यास कैदेची शिक्षा ठेवण्याचा उपक्रम प्रथमच करण्यात येणार आहे. याबाबतची तरतूद करणारे विधेयक रेल्वेमंत्री जगजीवनराम यांनी आज लोकसभेत मांडले. या विधेयकाप्रमाणे सांखळी ओढणाऱ्यास तीन महिन्यांपर्यंत कैद किंवा 250 रुपयांपर्यंत दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
1000 वर्षांपूर्वीची 365 नाणी सापडली
अकोला – वाशिम तालुक्यातील रिसोड येथे एका घराचा पाया खणत असता संवत् 1000 असा शिक्का असलेली 365 नाणी सापडली. या नाण्याची जाडी हल्लीच्या नया पैशाच्या दुप्पट आहे. या सर्व नाण्यांचे मिळून 126 तोळे वजन आहे. त्यांच्यावर उर्दू लिपितील काही अक्षरे आहेत. या ठिकाणी तत्काळ सरकारी अधिकाऱ्यांनी जाऊन नाणी ताब्यात घेतली आहे.