-प्रा. अविनाश कोल्हे
गेली सुमारे शंभर वर्षे तमिळनाडूच्या राजकारणाची दिशा “टोकाचा ब्राह्मण विरोध’ अशी राहिली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तेव्हाच्या मद्रास प्रांतात पेरीयारस्वामी, जस्टीस पार्टी, आत्मसन्मान चळवळ नावं जोरात होती. हे चित्र डोळ्यांसमोर ठेवले म्हणजे मे 2021 मध्ये होत असलेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुका कशा चुरशीच्या होतील याचा अंदाज येतो.
आजच्या तमिळनाडूतील राजकीय चित्र पुरेसं स्पष्ट झालेलं नाही. गेल्या काही वर्षांत तेथे दूरगामी महत्त्वाच्या घटना घडल्या. द्रमुकचे सर्वेसर्वा करूणानिधी आणि अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या मृत्यूंमुळे राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. देशातल्या अनेक प्रादेशिक पक्षांत असते तशीच घराणेशाही आणि पक्षांतर्गत वाद द्रमुक आणि अण्णा द्रमुकमध्येही होते आणि आहेतही. करूणानिधींनी आपला पुत्र स्टॅलिनला वारस घोषित केलं होतं. त्यामुळे द्रमुकचे नेतृत्व स्टालिनकडे सहजतेने आले खरे पण त्यांचे बंधू अलगिरी यांनी वेगळी चूल मांडली आहेच. अण्णा द्रमुकमध्ये अम्माचा मृत्यू झाल्यावर दोन गट पडले होते. आता त्या गटांमध्ये जरी समझोता झालेला दिसत असला तरी अशा समझोत्यांचे आयुष्य फारसे नसते हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे. हे कमी की काय म्हणून सुप्रसिद्ध सिनेनट रजनीकांत यांनी अलिकडेच नव्या पक्षाची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे तर आमचा पक्ष येती विधानसभा निवडणूक लढवेल असेही जाहीर केले आहे.
तमिळनाडूच्या राजकारणाची खासियत म्हणजे 1967 सालापासून तेथे द्रमुक किंवा अण्णा द्रमुक यांच्यात सत्ता आलटून पालटून वाटून घेतलेली आहे. तेव्हापासून तेथे राष्ट्रीय पक्षाला स्थान नाही. आता भाजपा हे चित्र बदलण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. अमित शहा यांनी दोन दिवसांच्या दौऱ्यात घेतलेले कार्यक्रम, कार्यकर्त्यांबरोबर केलेली चर्चा वगैरे बघता भाजपा आतापासून कामाला लागल्याचे दिसून येत आहे. शहांच्या उपस्थितीत करूणानिधींचे सुपुत्र अलगिरी यांच्यासह द्रमुकमधील अनेक असंतुष्टांनी भाजपात प्रवेश केला.
तमिळनाडूच्या राजकीय इतिहासाप्रमाणे 2016 च्या निवडणुकांत द्रमुक सत्तेत यायला हवा होता. पण तेव्हा अण्णा द्रमुकने पुन्हा द्रमुकचा पराभव केला. तेव्हा अण्णा द्रमुकच्या विरोधातील मतांत फुट पडली. द्रमुक आणि डावे पक्ष अधिक दलितांच्या पक्षाची तिसरी आघाडी अशा तिरंगी लढतीचा अण्णा द्रमुकला फायदा झाला.
तमिळनाडूत गेली साडेनऊ वर्षे अण्णा द्रमुकची सत्ता आहे. मात्र मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अण्णा द्रमुक-भाजपा युती भुईसपाट झाली होती. तमिळनाडूतील एकूण 39 लोकसभा जागांपैकी द्रमुकने 38 जिंकल्या होत्या! या संदर्भात भाजपाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचा विचार केला पाहिजे. मे 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपाला तमिळनाडूत 5.48 टक्के मतं मिळाली होती, तर 2019 मध्ये फक्त 3.66 टक्के मतं मिळाली होती. याचा अर्थ साधा आहे. भाजपाच्या मतांत दोन टक्क्यांनी घट झाली आहे.
भाजपाच्या पुढे असलेलं आव्हान बरंच कठीण आहे, यात शंका नाही. गेली साडेनऊ वर्षे सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुकची खास चर्चा करणे गरजेचे आहे. हा पक्ष प्रथमच जयललिता नसतांना निवडणुका लढवत आहे. अण्णा द्रमुक आणि भाजपाची युती जवळजवळ नक्की असली तरी याबद्दल पक्षाच्या काही नेत्यांच्या मनात नाराजी आहे. गेले सहा महिने असे अनेक प्रसंग घडलेले दिसतात जेथे या दोन पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. मतभेदाचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपा आग्रह धरत असलेले त्रिभाषा सूत्र तर अण्णा द्रमुकला फक्त दोन भाषा हव्यात. अलिकडेच भाजपा समर्थकांनी विनायक यात्रा काढली होती. तेव्हासुद्धा दोन पक्षांतील मतभेद समोर आले होते.
एक वेळ या मतभेदांवर मात करता येईल पण अल्पसंख्याकांच्या मतांचं काय! 2011 सालच्या जनगणनेनुसार राज्यात ख्रिश्चन आणि मुस्लिमांची लोकसंख्या 12 टक्के आहे. अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाला यांच्या मतांचा विचार करावाच लागेल. 2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत अण्णा द्रमुकला 40 टक्के मतं मिळाली होती. मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांत अण्णा द्रमुक आणि भाजपा युतीला 18 टक्के मतं मिळाली होती. बिहार विधानसभा निवडणुकीचा एक संदेश असाही गेला की भाजपा आज ना उद्या युती केलेल्या प्रादेशिक पक्षाला संपवतो. याचा पुरावा म्हणून नितीश कुमारांच्या पक्षाच्या कमी झालेल्या जागांकडे बोट दाखवले जाते.
असाच प्रकार महाराष्ट्रात सेनेबद्दलही झाल्याचे दाखवता येते. अशा स्थितीत भाजपाशी युती म्हणजे अस्वलाची मिठी ठरणार तर नाहीना? अशी शंका काही अण्णा द्रमुक नेते उपस्थित करत आहेत. आज अण्णा द्रमुकमध्ये असेही वातावरण आहे की फेब्रुवारी 2017 मध्ये जेव्हा विद्यमान मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी कारभार स्वीकारला होता तेव्हा परिस्थिती नाजुक होती. पण या सरकारने करोना काळात धिराने कारभार केला आणि समाजाचे कौतुक मिळवले. अशा स्थितीत भाजपाशी युती केल्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त असतील.
ही अण्णा द्रमुकची जमेची बाजू असली तर ही पहिली निवडणूक आहे जिथं जयललितांसारखी करिश्मा असलेली व्यक्ती नाही. अशा स्थितीत दिल्लीत सत्तेत असलेल्या पक्षाशी युती केल्यास फायदे होतील असं मानणाऱ्यांचा गट आहेच. तमिळनाडूचा राजकीय इतिहास बघितला तर या राज्यात कोणताही पक्ष स्वबळावर सत्तेत येत नाही. तेथील प्रत्येक निवडणुकांच्या आधी द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे दोन प्रमुख प्रादेशिक पक्षं अनेक छोट्याछोट्या पक्षांशी युती करतात.आजही द्रमुकची कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षाशी युती आहेच. जर अण्णा द्रमुक आणि भाजपा युती झाली तर तमिळनाडूत एका बाजूला द्रमुक आणि कॉंग्रेसची युती असेल तर दुसरीकडे अण्णा द्रमुक आणि भाजपाची युती असेल.
तसं पाहिलं तर तमिळनाडूच्या राजकारणात नेहमी सिनेनटांचं वर्चस्व राहिलं आहे. द्रमुकचे संस्थापक अण्णा दुराई, त्यांच्यानंतर नेतृत्वाची धुरा सांभाळणारे करूणानिधी हे दोघेही उत्तम पटकथा लेखक होते. एम. जी. रामचंद्रन, जयललिता तर लोकप्रिय कलाकार होते. या मालिकेत आता रजनीकांत यांचे नाव घ्यावे लागत आहे. दुसरे नामवंत नट कमल हासन यांचा एमएनएम हा पक्षसुद्धा निवडणुका लढवणार आहे.