-अरुण गोखले
कोणत्याही घरातील नवजात बालकाचा जन्म हा त्या घरातल्या लोकांसाठी तो एक आनंदाचा, परम भाग्याचा क्षण असतो. प्रत्येक स्त्री ही त्या मातृत्वाच्या सुखद क्षणाची आतुरतेने वाट पाहत असते. कारण बाळाच्या जन्मा बरोबरच तिचं आणि तिच्या बाळाचं एक नवं नात जन्मास येत असत, माय-लेकराचं.
बाळाचा जन्म हा काल पर्यंतच्या एका स्त्रीला, मुलगी, युवती, पत्नी या तिच्या असलेल्या ओळखी पेक्षाही ही माता आहे, लेकराची आई आहे ही तिची नवी ओळख मिळवून देते. तिला मातृत्वपद बहाल करते. तिला तिच्या स्त्री जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. तिचं मन आपल्याला मातृत्व बहाल करणाऱ्या नव्या बाळाला प्रेमाने आपल्या उराशी कवटाळत त्याला कृतज्ञतापूर्वक हेच म्हणत असते की-
बाळा होऊ कशी उतराई?
तुझ्यामुळे मी झाले आई ।
प्रत्येक स्त्री ही या मातृत्वपदाची अधिकारी होण्याचे आणि आई होण्याचे स्वप्न पाहत असते. घरातले आजी-आजोबा नातवंडाचे मुख पाहायला आसूसलेले असतात. घराचं घरपण हेसुद्धा त्या घरात रांगणाऱ्या बाळामुळेच टिकतं आणि फुलत असते. त्या नवजात बालकाच्या जन्माबरोबरच तो अशी अनेक नवी नाती जोडत जन्मास येत असतो.
ते बाळ आई-वडिलांचा मुलगा किंवा मुलगी असते. आजी-आजोबांचा नात-नातू असते. कुळाचा कुलदीपक असतो. बाळाच्या आगमनाने घरातल्या ताईला लहाण भाऊ मिळतो किंवा दादाला बहीण मिळते. काका-काकूस पुतण्या-पुतणी तर मामा-मामीस भाचा किंवा भाची मिळते. या आणि अशा प्रकारे जन्मास येणाऱ्या जीवाची त्याच्या जन्माबरोबरच अनेकांशी वेगवेगळी नाती जोडली जातात.
या जोडलेल्या नात्याशी ते बाळ जन्मभर जोडलेले असते. बाळाला उभ्या आयुष्यात ही नाती टिकवायची असतात, सांभाळायची असतात. त्याबरोबर येणारी त्याची कर्तव्ये पार पाडायची असतात. माणूस आणि त्याची त्याच्या कुटुंबाशी असणारी ही कौटुंबिक नाती एवढेच त्याचे नातेसंबंध नसतात तर वाढत्या वयाबरोबर ह्या नात्यांमध्ये मित्र, मैत्रिणी, सखेसोबती ह्यांचीही भर पडते.
घरा-दारात रांगणारं बाळ घरात सुखसमृद्धी घेऊन येते. घरात आनंदी आनंद असतो. पाहुण्यांचा वावर असतो यामुळे तुटलेल्या नात्यांची साखळी पुन्हा जोडली जाते. पुढे हेच बाळ लहानाचे मोठे झाले की त्याची समाजाशीही काही वेगळी नाती आणि नातेसंबंधही जोडली जातात, तो समाजाचा, समूहाचा एक प्रमुख घटक मानला जातो. तो शेजाऱ्यांचा शेजारी होतो, नगराचा, देशाचा नागरिक होतो. त्याच्या ह्या वाढत्या वयाबरोबरच त्याचं विस्तारणारं हे नात्याचं विश्वही त्याची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडून टिकवायचे असते.