– माधव विद्वांस
नाना फडणवीस यांचे आज पुण्यस्मरण (13 मार्च, 1800). त्यांचा जन्म सातारा येथे 12 फेब्रुवारी, 1742 रोजी झाला. त्यांचे कारभारी शिक्षण नानासाहेब पेशवे यांच्याबरोबरच सातारा येथे झाले.
नाना फडणवीस हे बाणकोट जवळील वेळास गावातील भानू घराण्यातले. बाळाजी विश्वनाथ यांना जंजिऱ्याचे सिद्दीने तुरुंगात टाकले होते त्यावेळी भानूंचे कुटुंबाने त्यांना सोडविण्यासाठी खटपट केली त्यामुळे बाळाजीचे आणि भानू कुटुंबाचे संबंध दृढ झाले. पुढे बाळाजींबरोबर कोकणातून नशीब जमवण्यासाठी जी कुटुंबे आली त्यात रामजी महादेव भानू सातारला आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे झाल्यावर हरी महादेव भानू यांची फडणविसी म्हणून नेमणूक केली. त्यांच्या घराण्यात कर्तृत्वाने ही फडणविसी चालू राहिली ती नाना फडणवीस यांच्या अखेरपर्यंत. नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत नाना हे फडणविसीपदी 29 नोव्हेंबर, 1756 रोजी आले.
नाना फडणवीस यांचे कर्तृत्व बारभाईंचे कारस्थानात दिसून आले. रघुनाथरावाने कारस्थानाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पेशवाईतील 12 मुत्सद्दी एकत्रित आले व रघुनाथरावांचे मनसुबे उधळले गेले. यामध्ये नाना फडणवीस, हरिपंत फडके, मोरोबा फडणवीस, महादजी शिंदे, तुकोजीराव होळकर, सखारामबापू बोकील, त्रिंबकराव पेठे, भगवानराव प्रतिनिधी, मालोजी घोरपडे, रास्ते, फलटणचे निंबाळकर आणि बाबुजी नाईक ही प्रमुख मंडळी होती. राघोबास पदच्युत करून नारायणरावांची गरोदर पत्नी गंगाबाईंनी होणाऱ्या मुलास पेशवा करून त्याच्या नावाने कारभार करावा, असे ठरविण्यात आले. यालाच बारभाई कारस्थान म्हणतात.
नाना अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांची दिनचर्या शिस्तबद्ध होती. त्यांची लेखणी हीच त्यांची तलवार होती. सवाई माधवरावांच्या जन्मापासूनच पेशवाईचा कारभार ते सांभाळत होते. त्यांचे स्वतःचे हेरखाते होते. लढाई नाही पण राजकारण व त्यातील शह काटशह यात ते तरबेज होते. महादजी शिंदे आणि त्यांचा सलोखा होता. नानांनी व महादजींनी मराठा सत्तेवरील इंग्रजी आक्रमणाची लाट 25 वर्षे थोपवून धरली, यातच त्यांचे कर्तृत्व दिसून येते. काही कठोर निर्णयामुळे त्यांनी शत्रूही निर्माण केले होते. इंग्रज, टिपू आणि निजाम यांच्याबरोबर त्यांनी मुत्सद्देगिरीने राजकारण केले. महादजी शिंदे यांचे निधनानंतर मात्र त्यांना एकाकीपण आले. रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव पेशवेपदी आल्यावर नानांचे त्यांच्याशी जमले नाही. बाजीरावाने त्यांना नगरच्या किल्ल्यात बंदिवान केले. नानांना नवकोट नारायण असेही म्हणत. बाजीरावाने त्यांचे घर व संपत्ती जप्त केली होती. इंग्रजांनी सर्व संपत्ती त्यांच्या पत्नीस परत दिली तसेच बाजीरावास तिला पेन्शनही द्यायला लावली.
नानांनी एकूण नऊ लग्ने केली होती. मात्र त्यांना एक मुलगा झाला व तोही अल्पायुषी होता. शेवटची पत्नी जिऊबाई त्यांच्या निधन समयी फक्त 9 वर्षांची होती. नानांच्या निधनानंतर ती 54 वर्षे जगली. काही दिवस लोहगडनंतर कोकणात व अखेरीस वाई जवळील मेणवली येथे नानांनी बांधलेल्या वाड्यात राहण्यास आली होती.