केंद्रात आणि राज्यात आपल्याला कोणतेही आव्हान असू नये, यासाठी भारतीय जनता पक्ष सर्व शक्तिनिशी प्रयत्न करत असतो. प्रादेशिक स्तरावरचे पक्ष मोठे झाल्यास आपली ताकद कमी होईल आणि केंद्रात सत्ता आली तरी, कदाचित छोट्या छोट्या पक्षांना बरोबर घ्यावे लागेल आणि त्यांच्या तालावर नाचावे लागेल, असे भाजपला वाटते.
अटलबिहारी वाजपेयी यांनी स्थापन केलेल्या आघाडी सरकारमध्ये जयललितांचा अण्णाद्रमुक, समता पार्टी, ममता बॅनर्जी यांची तृणमूल कॉंग्रेस हे अनेक पक्ष वाजपेयींना वेगवेगळ्या अटी,शर्ती घालून त्रास देत होते, हा अनुभव आहे. त्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पक्षाचा पसारा वाढवत नेण्याचे धोरण आहे. विरोधातील पक्षांची सरकारे पाडणे किंवा त्यांच्या ऐक्याला सुरूंग लावणे, हाही भाजपच्या व्यूहरचनेचा भाग आहे.
बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड (जदयू) आणि लालू यादव-तेजस्वी यांचा राष्ट्रीय जनता दल (राजद) या पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले असून, ते व्यवस्थित सुरू आहे. परंतु या दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या अधूनमधून पेरल्या जातात. 27 फेब्रुवारी रोजी नागालॅंडमध्ये विधानसभा निवडणुका असून, तेथे जदयू व राजद हे मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. जदयू 2003 पासून नागालॅंडमधून निवडणूक लढवत असून, त्यांच्या काही जागा तेथून निवडूनही येत असतात. यावेळी जदयू नऊ जागांवर, तर राजद पाच ठिकाणी निवडणूक लढवणार असून, त्यांची तेथे युती नाही. परंतु नागालॅंडमध्ये युती नाही म्हणजे दोन पक्षांत भांडणे सुरू आहेत, असा अर्थ लावण्याचे कारण नाही.
गेल्या जानेवारीत नालंदा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना राजदचे नेते आणि बिहारचे शालेय शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी, रामचरितमानस आणि मनुस्मृती समाजात फूट पाडतात, असे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर या वक्तव्याबद्दल चंद्रशेखर यांनी माफी मागावी, अशी मागणी जदयूतर्फे करण्यात आली. या घटनेनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी, धान्यखरेदीसाठी बोलवलेल्या महत्त्वाच्या बैठकीत राजदचे कृषिमंत्री व सहकारमंत्री यांना निमंत्रित केलेच नाही. त्यामुळे या दोन पक्षांत मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या; परंतु दोन पक्षांच्या सरकारमध्ये काही बाबतीत मतभेद होत असतात. पण म्हणून सरकारला धोका आहे, असे मुळीच नाही. उलट बिहार सरकार पूर्णतः स्थिर असून, नितीशकुमार यांनी ज्या प्रकारे देशपातळीवरील विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी प्रयत्न चालवले आहेत, तशाच पद्धतीने तेजस्वीदेखील पावले टाकत आहेत.
गेल्या मंगळवारी तेजस्वी यांनी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची नवी दिल्लीत भेट घेऊन, विद्यमान राजकीय-सामाजिक परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी लगेच ट्विटरवर एक पोस्ट टाकली आणि भाजपने सरकारी उद्योग व राष्ट्रीय संपत्ती भांडवलदारांना गहाण ठेवली आहे. देशाला वाचवण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यात केले. गेल्या शनिवारी तेजस्वी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांची रांचीला जाऊन भेट घेतली. 2024च्या लोकसभा निवडणुका एकत्रितरीत्या लढवण्याबद्दल उभयतांमध्ये चर्चा झाली. केंद्रातून जातीय शक्तींच्या सत्तेस हटवण्याची गरज आहे, असेही त्यांनी प्रतिपादन केले.
काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचेही त्यांनी पाटण्यात स्वागत केले आणि महाशक्तीशी झुंज देण्यासाठी तरुण नेत्यांनी विशेष पुढाकार घेतला पाहिजे, हे अधोरेखित केले. गेल्या वर्षी तेजस्वी यादव यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक अध्यक्ष एमके स्टॅलिन तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या भेटी घेतल्या, बिगरभाजप पक्ष एकत्र आल्याखेरीज भाजपला टक्कर देता येणार नाही. त्यासाठी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवले पहिजेत, असे तेजस्वी यांचे मत आहे. शिवाय नितीशकुमार यांच्या भूमिकेला बळ देण्यासाठीही ते पावले टाकत आहेत. म्हणजेच नितीशकुमार आणि तेजस्वी हे दोघेही एकत्रितरीत्याच विरोधी ऐक्यासाठी धडपडत आहेत, असे दिसते. याचा अर्थ, दोघांमध्ये कोणतेही अंतर नसून, उलट नितीशकुमार हे आज ना उद्या मुख्यमंत्रिपद तेजस्वीच सांभाळणार आहेत, असे गृहीत धरून वागत असल्याचे सांगण्यात येते.
लालू हे आजारी असून, त्यामुळे तेजस्वी यांना त्यांचे दैनंदिन मार्गदर्शन मिळणे सध्या तरी कठीण आहे. अशा परिस्थितीत नितीशकुमार हे तेजस्वी यांना ग्रूम करत असल्याचे दिसते. बिहारच्या पलीकडे आपल्या राजकारणाचा परिघ वाढवावा, असे तेजस्वी यांना वाटत असावे. एकेकाळी लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी, बिहारमधूनच इंदिरा गांधीविरुद्ध आंदोलन सुरू करून देशात परिवर्तन घडवले. देशातील राजकीय बदलांची सुरुवात अनेकदा बिहारपासून झाली आहे. नितीशकुमार यांची ख्याती पलटूराम अशी झाली असली, तरी यापुढे कधीही भाजपबरोबर जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी जाहीरपणे दिली आहे.
लालू यांचा पक्ष तर सातत्याने प्रखर भाजपविरोधी भूमिका घेत आला आहे. राष्ट्रीय राजकारणात लालू यांची जागा आता तेजस्वी घेणार, हे स्पष्ट आहे. 25 फेब्रुवारी रोजी बिहारमधील सत्ताधारी महागठबंधनची भव्य सभा पूर्णिया येथे होणार आहे. तेजस्वी हे अत्यंत प्रभावी वक्ते असून, मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय आलाच होता. परंतु अद्यापपर्यंत विरोधी पक्षांच्या ऐक्यात अनेक अडथळे आले आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सपासारखे काही पक्ष सामील झाले नव्हते. चंद्रशेखर राव यांचे वेगळ्या आघाडीच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत, तर ममतादीदी आणि कॉंग्रेस यांच्यातही दरी निर्माण झाली आहे. विरोधी पक्षांच्या काही नेत्यांचे इगो मोठे आहेत. अशावेळी आदित्य वा तेजस्वीसारख्या नेत्यांनी अधिक पुढाकार घेतल्यास, भूतकाळाचे ओझे नसल्यामुळे विरोधी एकजुटीसाठी ते महत्त्वाची भूमिका वठवू शकतील. देशाचे नेतृत्व तरुणांच्या खांद्यावरच असले पाहिजे.