-अरुण गोखले
माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे, हे आपल्याला कळते. पण माणसाचा नेमका धर्म कोणता? त्याने काय करायला हवे, कसे वागायला हवे हे त्यास नेमकेपणाने कळत नाही.
तो माणुसकीचा धर्म कोणता? हे सांगताना पू. गाडगेबाबा आपल्याला सांगतात की, “बाबांनो! तुम्ही जसा स्वत:चा विचार करता तसाच इतरांचाही विचार करायला शिका. सभोवतालच्या समाजातील जात, धर्म, पंथ ह्यांचा विचार न करता जो कोणी भुकेला आहे त्याला अन्न द्या. भुकेल्याची भूक आणि तहानलेल्याची तहान भागवा. लक्षात घ्या की, ही तहान, मग ती तहान पाण्याची असेल, प्रेमाची असेल, आपुलकीची असेल, ती ओळखून त्याला ते देऊन त्याची तहान भागवणे हा तुमचा धर्म आहे. ज्यांना अंगभर वस्त्र नाही, त्यांना आपण निदान आपल्या अंगावरचा जुना कपडा तरी देऊन त्यांची उघडी पडणारी लाज राखावी.
‘ गाडगेबाबा सांगतात की, “बाबांनो! पोटाची जशी भूक भागायला हवी तशीच ज्ञानार्जनाची भूकही भागायला हवी. त्यासाठी आपण आपल्या सभोवतीच्या सर्व समाजाला शिक्षण देऊन त्यांना साक्षर करायला हवे. पोरांच्या हातात शेणाची पाटी नाही, तर शिक्षणाची पाटी द्यायला हवी. निरक्षरतेपोटी होणारी त्यांची फसवणूक, त्यांच्या गळा पडणारे सावकारीचे पाश, निराशेने, दारिद्य्राने, असहाय्यतेने गळ्यात येणारे आत्महत्येचे दोर हे आपणच पुढाकार घेऊन तोडायला हवेत. गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची दारे उघडी करू देऊन त्यांच्या जीवनातला अज्ञानाचा अंधार हा ज्ञानाची ज्योती लावून दूर करायला हवा. ज्यांना निवारा नाही त्यांच्या डोक्यावर छप्पर उभं करून द्यायला हवं. ज्यांना आसरा नाही त्यांना आसरा द्यायला हवा. अंध, अपंग, दु:खीकष्टी अशा जीवांना मायेच्या ममतेने मदत करायला हवी. त्यांच्यासाठी सहकार्याचा हात पुढे करायला हवा.’
गाडगेबाबा पुढे सांगतात की, “आपल्या जिभेचे चोचले भागवण्यासाठी मुक्या प्राण्यांची हत्या थांबवा. मुक्या प्राण्यांवर प्रेम करा. मुक्या प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे.’
गाडगेबाबा सांगतात, “गोरगरिबांचे संसार उभे करून द्या. त्यांच्या लग्नकार्यात मदत करा. आपल्या भोवतीच्या दु:खीकष्टी, निराश झालेल्यांचे अश्रू पुसा. त्यांना जगण्याची नवी उमेद द्या.’ “बाबांनो! ह्यातलं जे आणि जेवढं म्हणून तुम्हाला करता येणार असेल ना, ते तुम्ही अवश्य करा. लोकसेवा हीच ईश्वराची सेवा आणि त्याची खरी पूजा आहे. माणसामाणसांत माणुसकी जागवीत जगणे हाच रोकडा धर्म आहे. तोच प्रपंच्यातला परमार्थ आहे.’