महागाई हा मुद्दाच नाहीये हे कित्ती बरं आहे ना..! नाहीतर कोपऱ्यातल्या लालभडक सिलिंडरकडे बघून आम्ही जाता-येता दचकलो असतो. कदाचित त्याला सॅल्यूटही केला असता. काही वर्षांपूर्वी सर्वसामान्य ग्राहकाला ज्या दरानं हा सिलिंडर मिळत होता, त्यापेक्षा दुप्पट किमतीत तो विकत घेण्याची ऐपत आता उज्ज्वला योजनेतले गोरगरीब लोक बाळगतात, ही काय साधीसुधी अचिव्हमेंट नव्हे! निवडणूक कुठलीही असो… मतदान होण्याचा अवकाश, निकाल जाहीर होण्यापूर्वी एक तरी “धक्का’ लोकांना बसलाच पाहिजे, हे धोरण आत्यंतिक मनोरंजक!
अशा या मनोरंजक धक्क्यासाठी पेट्रोल, डीझेल आणि गॅसचा सिलिंडर हे हुकमी एक्के. सरकारी तिजोरी भरणारी ती खजिन्याची विहीर आहे, असं म्हणायला हरकत नाही. फार फार वर्षांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी पेट्रोलच्या दरवाढीवरून कुठेतरी, काहीतरी पोस्ट टाकली होती म्हणे! त्यानंतर आजच्या तारखेपर्यंत कुण्या सेलिब्रिटीनं कुठल्याही इंधन दरवाढीवर एकही निगेटिव्ह शब्द बोलल्याचं ऐकिवात नाही. आजकाल तर उलट भाववाढीचं समर्थन करणारे भेटतात… अगदी पावलोपावली! काल असाच एकजण भेटला. गॅसच्या दरवाढीचा विषय काढायचा अवकाश… तो म्हणाला, “”दारूच्या एका बैठकीवर दोन हजार खर्च करता आणि बाराशेचा सिलिंडर परवडत नाही म्हणता?” त्यानंतर त्याच्या तोंडाचा दांडपट्टा असा काही फिरत राहिला, की “”बाबारे, मी दारू पीतच नाही,” हे वाक्य बोलायला मला दहा मिनिटं लागली!
अचानक सर्वकाही परवडू लागलेल्या अशा असंख्य व्यक्ती तुम्हाला हल्ली जागोजागी भेटतील. तुमच्या घराचं बजेट कोलमडलं असेल, तर कुठे काटकसर करायची आणि कुठे, कशी भरपाई करायची, याचं प्लॅनिंग करून देतील. अशा व्यक्ती तुमचा जो खर्च “वायफळ’ ठरवतील तो खरोखर वायफळ आहे, असं मान्य करून टाका; नाहीतर तुमचे आणखी दोन तास गेलेच म्हणून समजा! कोपऱ्यातला लालभडक सिलिंडर बघून ज्यांना खरोखर भीती वाटते, त्यांनी ती भीती कुठेही बोलून दाखवू नये, असा आमचा मित्रत्वाचा सल्ला आहे. अशा घाबरणारांनी “धक्कातंत्राचं मर्म’ नीट माहिती करून घेतलं पाहिजे. त्यातली मौज समजून घेतली पाहिजे.
प्रत्येक गोष्ट आपल्या फायद्यासाठीच चाललेली आहे, याची खात्री बाळगली पाहिजे. कुणी कुणाला सणसणीत चपराक लगावली आणि कुणाची कुणाविरुद्ध बोलताना जीभ घसरली, हे आपल्यापुढचे महत्त्वाचे विषय आहेत. निवडणुकीत कुणाची जिरणार आणि कुणावर गुलाल उधळला जाणार, याविषयी आपण अधिक चर्चा करायला हव्यात. कोणत्या निवडणुकीचा भविष्यातल्या निवडणुकांवर परिणाम होईल आणि कोणत्या निवडणुकांचा प्रभाव दोन दिवसच टिकेल, याविषयी आपल्याला अधिक काळजी वाटली पाहिजे. निकालाच्या आदल्या दिवशी होणारी दरवाढ या विषयांपुढे कस्पटासमान!
कुणाच्या घरातलं अन्न गॅसवर शिजतं आणि कोण चुलीचा वापर करतो, हा काय चर्चेचा विषय आहे? इंधन कोणतंही असो, पदार्थ शिजण्याइतकं तापमान वाढवतंच. आपलं लक्ष राजकीय आखाड्यातल्या तापमानावर खिळून राहायला हवं. आपण उगाचच गॅसच्या सिलिंडरकडे पाहून दचकतो, या विचारानं आपल्याला “गिल्ट’ यायला हवा. राजकारणाच्या आखाड्यात निर्धोक वावरणारे लोक पाहा! आपण कधीही “आत’ जाऊ शकतो, याची तमा न बाळगता बडबडत राहतातच ना? गॅस सिलिंडर वगैरे अनावश्यक विषय टाळून?