वाढती लोकसंख्या ही आर्थिक प्रगतीच्या मार्गांत मोठी धोंड, अर्थमंत्री देशमुख यांचे निदान
ओटवा, ता. 5 – वाढती लोकसंख्या ही भारताच्या आर्थिक प्रगतीच्या मार्गांत मोठी धोंड असून त्यामुळे जनतेचे सध्याचे दरिद्री जीवनमानही टिकविणे मुश्कील होत आहे, असे भारताचे अर्थमंत्री श्री. चिंतामणी देशमुख यांनी निदान केले. श्री. देशमुख काल सुरू झालेल्या कोलंबो परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, भारतास आर्थिक अडचणींची जाणीव असून तो आपल्या उन्नतीस आतुर झाला आहे.
दक्षिण व आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या आर्थिक विकासार्थ कॅनडा व इतर राष्ट्रकुलीन देशांनी जी मदत केली आहे याबद्दल श्री. देशमुख यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 1957 पर्यंत जगाच्या या भागातील देशांना आपल्या विकास योजनेचे क्षेत्र वाढवणे शक्य होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. विकासाचा प्रश्न कायमचा असून सध्याच्या पिढीने अखंड श्रम करणे जरूर आहे असेही ते म्हणाले.
प. नेहरूंच्या पत्राची पृथ्वीप्रदक्षिणा
दिल्ली, दि. 5 – आपले वडील कै. मोतीलाल नेहरू यांनी आपल्याला पाठविलेले एक पत्र पाच वर्षे जगातील अनेक राष्ट्रांचा प्रवास करून व निरनिराळ्या राष्ट्राचे शिक्के मारून घेऊन हाती कसे पडले याचे एक मजेदार उदाहरण सांगितले.
ते म्हणाले, “”मला हे पत्र मिळाले तेव्हा मी आश्चर्याने थक्क झालो. त्याच्यावरील माझ्या वडिलांची सही मी ओळखली. मी तो लिफाफा फोडला तेव्हा ते पत्र पाच वर्षांपूर्वीचे असल्याचे मला आढळून आले. त्याने भारतातीलच नव्हे, तर जगातील बहुतेक राष्ट्रांचा प्रवास केला. ते कोठे अडकून पडले हे कळायला मात्र मार्ग नाही.”
“”मी जगाच्या दौऱ्यावर निघालो असता कै. मोतीलालजींनी मला हे पत्र लिहिले. परंतु माझ्या जहाजाने मुंबई सोडल्यानंतर ते जहाजाच्या पत्त्यावर पाठविलेले पत्र मुंबईला पोहोचले व त्यानंतर ते माझा पाठलाग करीत निघाले. अखेर मला ते वडिलांचे मृत्यूनंतर एका वर्षाने मिळाले. असे प्रकार सर्वत्रच घडतात. यावरून पोस्ट खात्यावर किती ताण पडतो याची कल्पना येईल.”