-माधव विद्वांस
आपल्या अजरामर भावगीतांनी आठवणीत असणारे कविवर्य वा. रा. कांत यांची जयंती. त्यांचा जन्म नांदेड येथे 6 ऑक्टोबर 1913 रोजी झाला.त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण 1931 साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा विवाह लक्ष्मीबाई, पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर यांच्याशी 1930 मध्ये झाला. चरितार्थासाठी निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून वर्ष 1933 ते 1945 या कालावधीत त्यांनी नोकरी केली. त्यांच्या सहा दशकांच्या साहित्यसेवेत कांत यांनी नाट्यकाव्य- कविता “दोनूली’ हा एक नवीन काव्यप्रकार मराठी साहित्यात आणला.
निजामाच्या कारकिर्दीत उर्दू भाषा ही राजभाषा होती. अशा राजवटीत वा. रा. कांत यांनी मराठीपण जपले होते. कविवर्य कांत यांची 1944 साली आकाशवाणीवर मराठी कार्यक्रमाचे संयोजक म्हणून नेमणूक झाली आणि त्यांच्या साहित्याला वाट मिळाली तसेच मराठवाड्यातील अनेक दडलेल्या साहित्यिकांनाही त्याचा फायदा झाला. आकाशवाणीसाठी त्यांनी नाटके, नभोनाट्ये, नाट्यकाव्ये व विविध प्रकारचा मजकूर लिहिला. त्यांचा उर्दूचा अभ्यास व व्यासंग असल्याने त्यांनी अनेक उर्दू साहित्याचे अनुवादन केले.
डॉ. रफीक झकेरिया यांचे “सुलताना रझिया’, यशपाल शर्माचे “मनुष्याची रूपं’, मौलाना अब्दुल हजिम शरीफ यांनी लिहिलेले “कालचे लखनौ’, शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या कवितांचा अनुवाद, ए. डी. गोरवाला यांच्या आंग्ल कादंबरीचा अनुवाद “मध्यस्थ’, हैदर यांच्या “मिर्जा गालिब-चरित्र व काव्य’ ग्रंथाचा अनुवाद तसेच राजेंदरसिंग बेदी यांच्या गाजलेल्या “एक चादर मैलिसी’ या लोकप्रिय कादंबरीचा मराठी अनुवाद इत्यादी अनुवाद लेखन त्यांनी केले.
त्यांचे “बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात’ हे भावगीत श्रीनिवास खळे यांनी पहाडी रंगात संगीतबद्ध केले व पंडित वसंतराव देशपांडे यांनी त्याला स्वर दिला. “आज राणी, पूर्विची ती प्रीत तू मागू नको- कालचे वेड्या फुलांचे रंग तू मागू नको’ या भावगीतातून काल आज आणि उद्याची वास्तवता त्यांनी अतिशय सुंदरतेने मांडली आहे.
“कळेंना घडीभर हि बरसात’, “राहिले ओठातल्या ओठात’, “सखी शेजारणी तू हसत रहा’ ही गाणी प्रसिद्ध आहेत. “वेलांटी’, “मरणगंध’, “दोनुली’ या काव्यसंग्रहांस महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार देण्यात आले. वर्ष 1988 साली महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे तसेच हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान करण्यात आला. तसेच वर्ष 1989 साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन सन्मानित केले गेले.
27 मार्च 2018 रोजी मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळातर्फे कविवर्य वा. रा. कांत यांचे “काव्यविश्व’ या ग्रंथाचे प्रकाशन केले. वा. रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र “कविवर्य वा. रा. कांत’- कृ. मु. उजळंबकर यांनी लिहिले आहे. त्यांची अखेरची कविता “मृत्युपत्र’ त्यांनी हॉस्पिटलमध्ये रचली. त्यांचे चिरंजीव मु. वा. कांत यांनी ती लिहून काढली. ही त्यांची हृदयस्पर्शी पण वास्तवता दाखविणारी कविता अखेरची ठरली. 8 सप्टेंबर 1991 रोजी या भावकवीचे मुंबई येथे निधन झाले.