लोकमत म्हणजे काय?
Great men are polite to other peoples ‘Wives’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. इतरांच्या बायकांना स्त्रीदाक्षिण्य दाखविण्यात बडे लोक तरबेज असतात. पण स्वतःच्या स्त्रियांशी त्यांचे वर्तन मूर्खपणाचे, अरेरावीचे व प्रसंगी निर्दयपणाचेही असते. तीच अवस्था आमच्या राज्यकर्त्यांची काही अंशी झाली आहे.
इतर राष्ट्रांशी वागताना अहिंसेचा, शांततेचा, नितांत प्रेमाचा व अखंड सहृदयभावाचा सतत वाहणारा निर्झर; परंतु स्वकीयांची न्याय्य गाऱ्हाणीसुद्धा दूर करण्याची तयारी नाही; उलट त्या गाऱ्हाण्यांची दाद लागावी म्हणून लोकांना निदर्शने करावी लागतात व त्यापायी निरपराध जनतेला लाठीमार व गोळीबार सहन करावे लागतात. आणि विस्मयाची गोष्ट ही की मुंबईतील बहुतेक सारी वृत्तपत्रे या निदर्शकांना व कामगारांना संपाचा आदेश देणाऱ्यांनाच शिव्याशाप देत आहेत व मृत्युमुखी पडलेल्या लोकांची जबाबदारी त्यांच्या शिरावर टाकीत आहेत.
त्यांना हे कळत नाही की मुंबईच्या बिगरगुजराथी जनतेत जर असंतोष नसता तर कामगारांना संपाचा आदेश देण्यास मजूर पुढारी धजले नसते. रोगाचे खरे मूळ प्रकट करण्यास मुंबईचे पत्रकार तयार नाहीत.
भारताचा मध्यबिंदू सापडला
नागपूर, ता. 25 – सिहोरा गावाजवळ भारताचा मध्यबिंदू सापडल्याचे वृत्त आहे. दुंडी रेल्वे स्टेशनच्या दक्षिणेस आठ मैलांवर व सिहोरा-धिमरखेडा रस्त्याच्या पासून सुमारे दीड मैलावर हा केंद्रबिंदू येतो.
भारताच्या ह्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी खूण म्हणून भारत सरकार एक उद्यान व ग्रामीण जनतेसाठी विश्रांतीगृह बांधणार आहे. या बांधणीस एक कोटी रुपये खर्च होईल. या मध्यबिंदूकडे जाण्यासाठी पक्का रस्ता तसेच वेधशाळा उभारण्यात येणार आहे. हा भाग जंगलांनी वेढलेला असल्याने निसर्गसौंदर्याची लयलूट आहे.
मृत बालिका जिवंत झाली
जोहान्सबर्ग – चौदा वर्षांची मृत आफ्रिकन बालिका थडग्यातून उठून बाहेर आली. पत्रकारांनी तिची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली तेव्हा ती म्हणाली की, माझ्या नातेवाईकांप्रमाणेच मला स्वतःलाही मी मरण पावले असे वाटत होते. मी आजारी होते. माझ्या छातीवर काही आले आहे असे मला वाटले.
मला जगायचे होते. इहलोक सोडायचा नव्हता. नंतर माझा सर्व गोंधळ उडाला. मी अरण्यात गेले. तेथे लोक बसले होते. मला त्यांच्याकडे जावयाचे होते. त्यासाठी मी प्रयत्नांची शिकस्त केली पण त्यांचेपर्यंत पोचू शकले नाही.