-पद्मश्री अशोक भगत
जैविक शेती ही काळाची गरज आहे. रासायनिक शेतीने आपल्या जमिनीचा पोत बिघडविला आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके यामुळे पिकांचे उत्पादनही चांगले येत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांनी जीवामृत तयार करण्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. सरकारी यंत्रणांबरोबरच खासगी संस्थाही असे प्रशिक्षण देतात. जीवामृताचा वापर करून शेतकऱ्यांनी आपली जमीन पडिक होण्यापासून वाचविली पाहिजे.
भारताची संस्कृती ही ऋषी आणि कृषी संस्कृती आहे. यात गोपालनाला विशेष महत्त्व आहे. गोवंशाप्रती समाजाला आस्था आहे. त्यामागे गोवंशाचे महत्त्व स्वीकृत करण्याबरोबरच धार्मिक भावनाही आहे.
परकीय संस्कृतीच्या प्रभावामुळे देशात काही ठिकाणी, विशेषतः शहरी भागांत सांस्कृतिक विद्रुपता पाहायला मिळते; परंतु ग्रामीण समाज आजही परंपरा आणि संस्कृतीच्या आधारे आयुष्य व्यतित करण्यालाच महत्त्व देतात. पाळीव पशूंसाठी आपल्या समाजात उत्सव, सण साजरे केले जातात, यावरूनच आपल्या समाजात पशुपालनाला असलेले महत्त्व अधोरेखित होते. दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी झारखंडमध्ये आदिवासी समाज सोहराई पर्व साजरे करतो. हे पशुधनाच्या पूजेचेच पर्व आहे. सोहराईच्या दिवशी पाळीव प्राण्यांची पूजा केली जाते. निसर्ग आणि पशूंबद्दल आदिवासी समुदायाला असलेले प्रेम यातून दिसून येते.
जैविक शेतीचा प्रचार तर खूप जोमाने केला जातो; परंतु त्याचबरोबर जीवामृताचा प्रचार करणेही गरजेचे आहे. विशेषतः ग्रामीण क्षेत्रात तो व्हायला हवा. आज संपूर्ण जग रोगाने, युद्धांनी आणि नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त आहे. या सर्व समस्या निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत. जर आपण आपल्या भोवतालचे वातावरण निसर्गाशी अनुकूल असे बनविले तर अनेक समस्यांपासून सहजपणे मुक्ती मिळू शकेल. पिकांमधील पौष्टिक घटकांमधून शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. ही शक्ती आजारांपासून आपला बचाव करते. जमीन ही माता आहे आणि रोपे ही तिची अपत्ये आहेत. जमिनीत जर रोगप्रतिकारशक्ती नसेल तर तिचीच अपत्ये असलेल्या रोपांमध्ये ती येणार नाही. याचाच अर्थ असा की, जर रोपांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण करायची असेल तर आधी ती जमिनीत तयार करायला हवी.
जमिनीला रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणाऱ्या जीवनद्रव्याची निर्मिती फक्त आणि फक्त जैविक शेतीमधूनच होते. यालाच आपण नैसर्गिक शेती असेही म्हणतो. रासायनिक शेतीमुळे जीवनद्रव्ये, ह्यूमस नष्ट होतो. जर आपल्याला आपले आणि समाजाचे रक्षण करायचे असेल, तर जैविक शेतीला प्रोत्साहन द्यावे लागेल. जैविक शेती केल्यास आपल्या परंपराही खंडित होत नाहीत. जैविक शेतीत कीटकांच्या हल्ल्याची शक्यता असते; परंतु त्यांना थोपविण्यासाठी काही जैविक कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे. ही कीटकनाशके बाजारातून न आणता घरच्या घरीच तयार केली पाहिजेत. ही वनस्पतिजन्य कीटकनाशके कीटकांना मारत नाहीत, तर पळवून लावतात.
या कीटकनाशकांचा शिडकावा केल्यामुळे पीक सुरक्षित राहते आणि वातावरणावरही त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. जीवामृत तयार करण्यासाठी देशी गायीचे मूत्र आणि शेण, जुना गूळ, कोणत्याही डाळीचे पीठ, पाणी तसेच पिंपळासारख्या मोठ्या वृक्षाखालची मूठभर माती किंवा शेतातील पिकाच्या मुळाला चिकटलेली थोडी माती या घटकांचा वापर केला जातो. सर्वांत आधी गोमूत्र एका कंटेनरमध्ये ठेवले जाते आणि त्यात दहा किलोग्रॅम गायीचे शेण मिसळले जाते. मूत्रात शेण विरघळेपर्यंत हलविले जाते.
त्यानंतर एक किलो गूळ दुसऱ्या एखाद्या पाण्याच्या भांड्यात विरघळवला जातो. मिश्रणातील बॅक्टेरिया सक्रिय व्हावेत यासाठी गुळाचा वापर केला जातो. नंतर गूळ विरघळलेले मिश्रण शेण विरघळलेल्या मूत्रात मिसळले जाते. नंतर त्यात एक किलो बेसन मिसळले जाते. हे मिश्रण एखाद्या मोठ्या कंटेनरमध्ये ठेवले जाते आणि थोडा वेळ लाकडी दांडक्याने ढवळले जाते. त्यानंतर त्यात 200 लिटर पाणी मिसळले जाते. त्यानंतर हे मिश्रण चार दिवस तसेच ठेवून दिले जाते. परंतु दररोज वेळोवेळी ते लाकडी दांडक्याने ढवळले जाते. चार दिवसांनंतर या मिश्रणाचा वापर रोपांवर केला जातो.
अशाच प्रकारे कडुलिंबापासून प्रभावी असे कीटकनाशक तयार केले जाते. रस शोषणारी अळी आणि अन्य कीटकावर हे द्रावण प्रभावी ठरते. याचे जैविक विघटन होत असल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. हे मिश्रण केवळ हानिकारक कीटकांनाच मारते, लाभदायक कीटकांना धक्काही पोहोचवीत नाही. हरितक्रांतीनंतर भारतीय शेतीत रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला, त्यामुळे आपल्या जमिनीचा पोत बिघडला आहे. शेतीयोग्य जमीन वेगाने पडिक जमीन बनली आहे. शेतकऱ्यांचा पैसा रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे.
या रासायनिक खतांमुळे पिकांच्या उत्पादनावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी आता जैविक शेतीलाच प्राधान्य दिले पाहिजे. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांचेच योग्य व्यवस्थापन करून पिकांचे उत्पादन वाढविणे हे जैविक शेतीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कंपोस्ट खत, वर्मी कंपोस्ट, जीवामृत, गोमूत्र आदींचा उपयोग वाढवायचा आहे. सध्या सरकारी यंत्रणांबरोबरच काही खासगी संस्थाही जीवामृत तयार करण्याचे प्रशिक्षण देतात. अशा ठिकाणी प्रशिक्षण प्राप्त करून शेतकरी आपल्या घरी जीवामृत तयार करू शकतात आणि आपली जमीन पडिक होऊ नये, यासाठी प्रयत्न करू शकतात.