समाज धारणेचे नियम कालानुसार बदलावे
पुणे, ता. 19 – “समाजधारणा करणारे नीतिनियम बदलत्या कालमानानुसार बदलणे इष्ट ठरेल’, असे मत डिस्ट्रिक्ट व सेशन्स जज्ज व्ही. ए. नाईक यांनी आज सकाळी ट्रेनिंग कॉलेजच्या सभागृहात बोलताना व्यक्त केले.
अखिल भारतीय स्त्री-संघटनेच्या वतीने चालू असलेल्या “वेश्याव्यवसाय प्रतिबंध’ या विषयावरील परिसंवादांत नाईक यांचे भाषण झाले. नीतिनियमाचे प्रकार स्थूलमानाने सांगताना ते म्हणाले, काही नीतिनियम चिरंतन स्वरूपाचे असून, काही सापेक्ष असतात. मानवी स्वातंत्र्य आणि सत्य हे शाश्वत नियम असून इतर सापेक्ष नियम समाजाच्या बदलत्या स्वरूपाप्रमाणे बदलावे लागतात.
हॉफकिन संस्थेसाठी निधीची व्यवस्था
मुंबई – हॉफकिन इन्स्टिट्यूटच्या विकासासाठी व संशोधन कार्याला उत्तेजन देण्यासाठी मुंबई सरकारने एक निधी निर्माण केला आहे. या संस्थेच्या नफ्याची निम्मी रक्कम दर वर्षी या निधीत समाविष्ट करण्यात येईल. या निधीच्या विनियोगासाठी अर्थमंत्री डॉ. जीवराज मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
सीमा लढा तीव्र का झाला?
बंगळूर – “भाषिक अल्पसंख्याकांना घटनेनुसार असलेल्या हक्कांची जपणूक म्हैसूर सरकारने केली असती तर सीमा लढा इतका उग्र बनला नसता’, असे साम्यवादी पुढारी एस. ए. डांगे यांनी आज येथे वार्ताहरांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले की, म्हैसूर सरकारने याबाबतीत बेफिकीरी दाखविली आहे असा माझा आरोप आहे. शिक्षण व नोकरवर्ग अशा बाबतची दोन उदाहरणे माझ्या नजरेस आली आहेत. सीमा लढा हा संयुक्त महाराष्ट्र समितीने नेहमीच दुय्यम स्वरूपाचा मानला आहे. आमच्या मागण्या एक किंवा दोन वर्षात आम्ही आपल्या पदरात पाडून घेऊ शकू अशी मला आशा आहे, असे शेवटी डांगे म्हणाले.
विविध भाषेतील नाटके नभोवाणी हिंदीत करणार
मुंबई – केंद्रीय माहिती खात्याच्या नाट्यशाखेने भारतातील विविध भाषांत असलेली चांगली नाटके हिंदीत बसवण्याची एक योजना आखली असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. ही नाट्यशाखा पंचवार्षिक योजनेच्या प्रचारासाठी नाटिका प्रहसने व तमाशे असे अनेक कार्यक्रम करीत असते. आता यापुढे या शाखेची जुनी भारतीय नाटके बसविण्याची योजना आखली असून त्यासाठी अखिल भारतातून प्रथम श्रेणीच्या 12 कलावंतांची नेमणूक केली आहे.