-ह.भ.प. नारायण म. डमाळे शास्त्री
नामामृत गोडी वैष्णवा लाधलीं । योगियां साधली जीवनकळा ।।
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवला लाधला कृष्ण दाता ।।
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।
हरिपाठातील आठव्या अभंगात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योगींना सतराव्या जीवनकलेच्या प्राप्तीमध्ये जे सुख व जी आवड आहे, तेच सुख व तीच आवड वैष्णवांना हरिच्या नामामृत सेवनामध्ये आहे. बाळपणीच प्रल्हादाच्या जिव्हेवर हरिच्या नामाचा उच्चार ठसला तसेच कृष्णासारखा उदार ज्ञानदाता उद्धवाला मिळाला.
माऊली म्हणतात, हरिचे नाम सर्व पारमार्थिक साधनांत सोपे आहे. पण ते मनुष्यांना दुर्मिळ झाले आहे. कारण हरिचे नाम कोणी घेत नाही. त्याची सुलभता व योग्यता जाणून ते नाम सदोदित घेणारा मनुष्य क्वचितच आढळून येतो.