-हिमांशू
एखाद्या मृतावर अंत्यसंस्कार करून मंडळी घरी परतली आणि ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले तोच माणूस समोर उभा ठाकला, असे काही किस्से आपण ऐकले आहेत. काही ठिकाणी तर मृताला चितेवर ठेवल्याक्षणी तो उठून बसल्याच्याही घटना घडल्या आहेत. करोनाच्या काळात शवागारातून मृतदेह गायब झाल्याच्या घटना ऐकायला मिळाल्या. करोनाच्या काळातला मृत्यूच मुळात खूप भयावह!
आप्तसोयरे पोहोचवायलाही जाऊ शकत नाहीत, अशी अवस्था. मोठ्या संख्येने मृत्यू होत असताना दोन मृतदेहांची अदलाबदल होणं किंवा एखादा मृतदेह शवागारातून गायब होणं हा काही फार मोठा चमत्कार म्हणता येणार नाही. परंतु मृत व्यक्ती जिवंत होण्याच्या घटनेकडे आजमितीस तरी चमत्कार म्हणूनच पाहिलं जातं. अर्थात, अनेकदा संबंधित व्यक्ती मृत्यू पावलीच नव्हती हे पुढे येतं. परंतु अशी मृत व्यक्ती अचानक समोर उभी राहणं हा मोठा धक्का असतो.
अर्थात, काही वेळा असे चमत्कार “गृहित’ धरले जात असावेत. त्यामुळे अचानक घाबरगुंडी आणि पळापळ होत नाही. आता हेच पाहा ना, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एक 62 वर्षांचे गृहस्थ मतदानासाठी आले. त्यांच्या बरोबर आणखीही दोन महिला होत्या. या तिघांकडे मतदान ओळखपत्र होतं. परंतु गावपातळीवर उमेदवार मतदारांना व्यक्तिशः ओळखणारे असतात. त्यामुळे एका उमेदवाराला या तिघांविषयी संशय आल्यावर त्यांनी आक्षेप घेतला.
हे तीनही मतदार बोगस असल्याचा संशय आल्यावर त्यातील 62 वर्षांचे गृहस्थ कुणाच्या नावावर मतदान करायला आलेत याची तपासणी झाली. संबंधितानं मृत व्यक्तीचं नाव सांगितल्यावर संशय आणखी बळावला. बूथवरच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना खबर दिली आणि या तिघांना ताब्यात घेतलं. अर्थात, ही झाली लक्षात आलेली घटना. विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक बूथवर मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्ती सगळ्यांच्या ओळखीच्या नसतात. बूथवरच्या कर्मचारी तर कुणालाच ओळखत नसतात. त्यामुळे आता मतदारांचे फोटोही मतदारयादीवर असतात. तरीसुद्धा “मृत व्यक्ती’ मतदानासाठी येतात हा मात्र चमत्कारच मानायला हवा. कितीतरी “मृत व्यक्ती’ विनासायास मतदान करून निघून जातात. परंतु सर्वांत मोठा चमत्कार म्हणजे अशा व्यक्तींकडे आढळणारी मतदार ओळखपत्रं. हुबेहूब खऱ्यासारखी ओळखपत्रं बनवतं कोण, हा संशोधनाचाच विषय आहे. या कलावंतांचा शोध घेतलाच पाहिजे. ही कला साधीसोपी नाही. खऱ्या ओळखपत्रावरचे फोटोसुद्धा खोटे वाटतात
अनेकदा! मतदार ओळखपत्र मिळालं म्हणून माणूस क्षणभर खूश होतो; पण त्याचाच फोटो त्यालाच ओळखू येत नाही, तेव्हा त्याचा उत्साह मावळतो. कित्येकांना आपल्या फोटोची तुलना एसटी स्टॅंडवरच्या गुन्हेगारांच्या फोटोशी करावीशी वाटते. पण बोगस मतदारांचे फोटो अगदी परफेक्ट येतात!
आपल्या निवडणूक प्रक्रियेत कधीकधी अशी सौंदर्यस्थळं दिसून येतात, की आपण थक्क होतो. आता हेच पाहा ना, जिवंत व्यक्तींनी मतदान करावं यासाठी सरकारला पैसे खर्च करून प्रबोधन करावं लागतं.
कितीतरी माध्यमांतून “मतदान हा हक्क आणि कर्तव्यसुद्धा आहे,’ असं कानीकपाळी ओरडून सांगावं लागतं. तरीसुद्धा अनेक जिवंत लोक मतदानाला जात नाहीत. त्याऐवजी पिकनिकला जातात. परंतु मृत व्यक्ती मात्र न बोलावता, न विसरता मतदानाला येतात. मतदानाचं महत्त्व इतक्या उशिरा कळतं?