-वंदना बर्वे
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अश्वमेधानं ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेत कमळाची बाग फुलविली आहे. मागील सहा वर्षांच्या काळात या अश्वमेधानं कितीतरी विरोधी पक्षांना सत्ताच्यूत केले आहे आणि आता पाणी पाजायचं आहे ते रालोआतील आजी-माजी घटक पक्षांना. थोडक्यात, भाजपचा डोळा आहे तो पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि पंजाबवर!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजपला हैदराबाद महानगरपालिकेत न भूतो न भविष्यतीः अशाप्रकारचं यश मिळालं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगणा राष्ट्र समिती सर्वात मोठा पक्ष आहे. मनपाची सत्तासुद्धा राखली आहे. तरीसुद्धा, भाजपनं मारलेली मुसंडी अनेकांच्या पायाखालची जमीन सरकवणारी आहे. भाजपचे 40 नगरसेवक निवडून आले आहेत. हैदराबादचे खासदार ओवैसी यांचा एमआयएम या पक्षानंसुद्धा चांगली कामगिरी बजावली आहे.
खरं म्हणजे, हैदराबाद मनपाचा पुढील महापौर भाजपचाच असेल असं टार्गेट अमित शहा यांनी निश्चित केलं होतं. याची सर्वस्वी जबाबदारी महासचिव भूपेंद्र यादव यांच्या खांद्यावर टाकण्यात आली होती. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशात यादव यांचा सिंहाचा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही.
दरम्यान, भाजपचा महापौर बनविण्यासाठी गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा प्रचारासाठी मैदानात उतरले होते. यावरून सहज लक्षात येईल की भाजपनं ही निवडणूक किती प्रतिष्ठेची बनविली होती. मनपा निवडणुकीच्या प्रचारात दुसऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपाध्यक्ष आणि गृहमंत्र्यांनी प्रचारात उतरण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. या महत्त्वाकांक्षेमुळे भाजपला अनेकांचे उलटसुलट बोलणेसुद्धा ऐकावे लागले. ओवैसी यांनी तर भाजपला उपरोधिक टोमणा मारला होता. त्यांच्यामते, भाजपनं फक्त अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचारात उतरवायचं बाकी ठेवलं.
या निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसला 56, एमआयएमला 42 आणि भाजपला 46 जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीत भाजपचे फक्त पाच नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे आताचे यश हे उठून दिसणारे आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडे 119 पैकी चार जागा होत्या. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 17 पैकी चार खासदार भाजपचे निवडून आले. पण आताची महानगरपालिकेची निवडणूक मात्र भाजपने सर्व ताकदीनिशी लढली.
मुळात, दक्षिणेकडील राज्यांमध्ये झेंडा फडकविण्यासाठी भाजप अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. स्वबळावर काहीही करता आलं नाही म्हणून राज्यातील पक्षांशी हातमिळवणी करून पाय रोवण्याचा प्रयत्न केला. तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं हाच प्रयत्न केला होता. ग्रेटर हैदराबाद मनपा निवडणुकीच्या निकालानं भाजपसाठी दक्षिणेचे द्वार उघडले असे म्हणायला हरकत नाही. यापूर्वी, इशान्येकडील राज्यांमध्ये भाजपला प्रवेश नव्हता. आता बहुतांश राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे.
या निवडणुकीत टीआरएस, एमआयएम आणि भाजप यांचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. मात्र, कॉंग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या. याचा अर्थ, कॉंग्रेस अजूनही गंभीरपणे राजकारण करताना दिसत नाही, असं म्हणावं लागेल. लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना अख्खा देश भाजपच्या सत्तेखाली आणायचा आहे. मोदी यांनी देशाची धुरा हाती घेतल्यापासून आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली आहे.
कॉंग्रेसप्रणित संपुआच्या घटक पक्षांची ज्या ज्या राज्यांमध्ये सत्ता होती. तेथे आता भाजप किंवा भाजप आघाडीची सत्ता आहे. पुढच्या वर्षी मुख्यमंत्री ममता दीदी यांच्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे. त्यानंतर तेलंगणा आणि पंजाबमध्ये निवडणूक आहे. भाजपचा डोळा या तिन्ही राज्यांवर आहे. महत्त्वाची बाब अशी की, तृणमूल कॉंग्रेस, अकाली दल आणि तेलंगणा राष्ट्र समिती हे तिन्ही पक्ष एकेकाळी रालोआचे घटक पक्ष होते.
भाजपने अलीकडेच बिहारच्या निवडणुकीत मुसंडी मारली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार असले तरी भाजप आमदारांची संख्या जेडीयूपेक्षा जवळपास दुप्पट आहे. जेडीयू एकेकाळी रालोआचा घटक पक्ष होता. बिहारमध्ये जेडीयूशी हातमिळवणी करून भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरत होता. आता सत्ताधारी आहे. थोडक्यात, संपुआच्या घटक पक्षांना सत्ताच्यूत केल्यानंतर भाजपच्या रडारवर आता रालोआचे घटक पक्ष आहेत, असं म्हणायला हरकत नाही.
आता भाजपच्या रडारवर आहे तो दीदींचा पश्चिम बंगाल. ममता बॅनर्जी आता आपला किल्ला राखण्यात यशस्वी होतात की नाही हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल; परंतु भाजप सध्या आक्रमक झाला आहे. अशातच, तृणमूल कॉंग्रेसने निवडणूक प्रचाराची योजना आखण्याचं काम दीदींनी प्रशांत किशोर यांच्या हाती सोपविले असल्याचे समजते. प्रशांत किशोर बिहार निवडणुकीच्यावेळी अचानक गायब झाले होते. दीदी दहा वर्षांपासून बंगालच्या सत्तेत आहे. आता तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी मैदानात उतरतील.
बंगालमध्ये विजयाची हॅट्ट्रिक साधण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्या खांद्यावर आहे. ही बाब पक्षातील अन्य नेत्यांना खूपत आहे. त्यांच्यामुळे पक्षात असंतोष वाढीला लागला आहे. अनेक आमदारांनी त्यांच्या विरोधातली नाराजी सार्वजनिकरित्या बोलून दाखवलेली आहे. या नाराजीचा फायदा भाजपाला घेता येतो का आणि आपला अश्वमेध प. बंगालपर्यंत नेता येतो हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच.