लोकमान्य टिळकांच्या श्वासाने भारलेला वारा या पुण्यात भरून राहिला आहे. ते ज्या भूमीवरून चालले त्याच भूमीवर आपण वावरत आहोत याचा विसर पडून कसे चालेल? लोकमान्यांचे स्मरण हे सतत स्फुरण, प्रेरणा देणारे आहेच तो आदर्श नेहमीच आपल्या समोर हवा. पण सध्याच्या कालखंडात त्यांचे कार्य आणि विचार यांचे मनन करण्याची नितांत आवश्यकता आहे.
लोकमान्य टिळक म्हणतात, मुलीचे लग्न 16 वर्षांच्या आत करू नये. मुलाचे लग्न 20 वर्षांच्या आत करू नये. पुरुषांचे लग्न 40 वर्षांनंतर करू नये, करावयाचे झाल्यास विधवेशीच करावे. विधवेचे वपन करू नये. दारू पिणे बंद असावे, हुंडा घेण्याची चाल अजिबात बंद करावी. प्राप्तीचा दहावा भाग सार्वजनिक कामाकडे द्यावा.’
यातली काही मते आजही अंमलात आणण्यास आपण कचरतो. मग इतक्या वर्षांपूर्वी अशी मते मांडण्यात केवढे धाडस, स्वकार्यावरील केवढी निष्ठा, केवढा आत्मविश्वास लागला असेल? त्यांची कृती अंगीकारली तरच लोकमान्य टिळकांचे वारसदार म्हणून इतिहासावर हक्क सांगण्याचा आपल्याला अधिकार राहील.