कोविडकाळातील प्रातिनिधिक गोष्ट : एक धनाड्य कुटुंब लॉकडाऊन “एन्जॉय’ करत होतं. व्यवसाय बंद असला तरी पैशाची कमतरता नव्हती. लॉकडाऊन आणखी वर्षभर लांबला तरी या कुटुंबाला काहीच फरक पडणार नव्हता. परंतु ज्यांना एक दिवस काम केलं नाही तरी फरक पडतो, अशी काही माणसं बंगल्यात अत्यावश्यक सेवा पुरवायला यायची.
कुटुंबातले लोक त्यांच्यापासून एरवीही चार हात लांबच राहत असत. आता तर कोविडमुळे हे अंतर आठ हात झालं होतं. त्यांच्याकडे बघितलं तरी आपल्याला कोविड होईल, असं या कुटुंबाला वाटायचं. पूर्ण कोंडून घेऊन या कुटुंबाचे रमी, कॅरम वगैरे खेळ रंगत असत. शिवाय रोज वेगवेगळ्या रेसिपीज करून सोशल मीडियावर फोटो टाकणं हा महिलांचा नित्यक्रम झालेला. एवढ्या कडेकोट वातावरणातही घरातल्या कर्त्या पुरुषाला एके दिवशी शिंक आली आणि कुटुंबीयांनी ताबडतोब त्यांना “स्वतंत्र ऍक्सेस असलेल्या’ रूममध्ये डांबलं.
लॅबवाल्यांना घरीच बोलावून आरटीपीसीआर केली तर मालक “पॉझिटिव्ह’! म्हणाले, “”हॉस्पिटलात नको. एकटं वाटेल. इथंच राहूद्या.” तिथेच औषधोपचार सुरू झाले. जेवणखाण दाराबाहेर ठेवून दार वाजवलं जायचं. मालक ताट न्यायला दार उघडायचा. एके दिवशी दार उघडलंच नाही. थोड्या वेळानं “अत्यावश्यक सेवा’वाले चौघे आले. दार तोडून मालकाला घेऊन गेले. कुटुंबीयांनी दुरूनच मालकाला हात जोडले आणि पेस्ट कंट्रोलवाले तातडीनं खोलीत शिरले.
शंभर वर्षांनंतरची काल्पनिक गोष्ट : एक धनाड्य कुटुंब कायमचा लॉकडाऊन लागल्याप्रमाणे कायम घरातच असे. बाहेरची दुनिया दृष्टीआडची सृष्टी बनलेली, कारण सरासरी तापमानच पन्नास अंशांच्या पुढे असायचं. बंगला पूर्ण बंदिस्त आणि एसी असल्यामुळे प्रदूषण फारसं घरात शिरत नसे. परंतु घरातल्या तरुण मुलीला चालत घराबाहेर जावंसं वाटे. ती तसा हट्ट वारंवार करायची; परंतु “जे बघायचं ते खिडकीतून बघ किंवा एसी गाडीतून जा,’ असा सल्ला तिला दिला जायचा.
खिडकीतून प्रचंड धुरकटलेलं शहर दिसायचं. मोटारीतून धूर नव्हे, तर धुरातून मोटारी जाताना दिसायच्या. शहरात पादचारी खूपच थोडे उरले होते. बरेचजण घरातून बाहेर पडताना नाकातोंडाला मास्क लावून तो पाठीवरच्या ऑक्सिजन सिलिंडरला जोडत असत. गरीब, धडधाकट लोक मास्क न लावताच रस्त्यावरून फिरताना दिसत.
श्रीमंताघरच्या लेकीला त्यांच्याबद्दल असूया वाटे. एकदाच घराबाहेर पडावं, पायी फिरावं हे तिचं स्वप्न होतं. परंतु घरात वेगळीच चर्चा चाललेली असे. प्रदूषण नियमावलीचा भंग केल्यामुळे या कुटुंबाला त्यांचा केमिकल प्लान्ट नुकताच बंद करावा लागला होता. त्यातून झालेल्या नुकसानीमुळे सगळेजण दुःखी होते. बक्कळ पैसा असूनसुद्धा लेकीला घराबाहेर पडता येत नव्हतं आणि घरातही सुख नव्हतं.
तात्पर्य : भरपूर पैसा जवळ असला तरी त्या पैशावर पोसलेले “आपले’ लोक कधी क्षणार्धात परके होतील याचा अंदाज कुणालाही बांधता येत नाही आणि ज्यांना गरीब म्हणून सतत दूर लोटलं, ते कधी कामाला येतील हेही सांगता येत नाही! तिजोरीत पैसा साठवता येतो; पण निर्भेळ सुख कधीच भरून ठेवता येत नाही. सबब, आर्थिक राजधानी पैशांतून नव्हे तर आपुलकी, माणुसकी, तारतम्य आणि घामातून उभी राहते.