गीतरचना व सुरेल काव्यवाचन, लेखक तसेच गायन यांसाठी प्रसिद्ध अशा कवयित्री, गायिका संजीवनी मराठे यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म पुणे येथे 14 फेब्रुवारी 1916 रोजी झाला. त्यांचे शिक्षण पुणे येथेच झाले. त्यांनी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) बी.ए. व एम.ए. पदव्या त्यांनी संपादन केल्या होत्या.
शालेय जीवनातच त्यांचे काव्यलेखन सुरू झाले होते. त्यांनी कवितालेखन सुरू केले त्याच सुमारास पुणे येथे “रविकिरण मंडळ’ स्थापन झाले. या मंडळाचा त्यांच्यावर प्रभाव राहिला. रवींद्रनाथ टागोरांच्या काव्याचाही त्यांच्यावर प्रभाव होता. संजीवनी यांनी आपल्या रचनांमधून निसर्ग, जीवनातील शाश्वत मूल्ये, मानवाच्या मनातील स्वप्ने यावर काव्यरचना केल्या. संजीवनी यांनी मराठी काव्यक्षेत्रात मोठे योगदान दिले.
वर्ष 1932 मध्ये कोल्हापूरला भरलेल्या साहित्य संमेलनात कवयित्री म्हणून त्यांची प्रथम ओळख झाली. त्याच वर्षी त्यांचा पहिला कवितासंग्रह “काव्यसंजीवनी’ प्रकाशित झाला. त्यांच्या काव्यातून प्रीतीबरोबर सश्रद्धता, वात्सल्यादि स्त्रीसुलभ भाव सुरेख पद्धतीने मांडले आहेत. त्यातून त्यांची सौंदर्यपूजक वृत्ती व सहृदयता दिसून येते. संसारी गृहिणीचे भावविश्व त्यांनी आपल्या कवितेतून चित्रित केले तसेच राष्ट्रप्रेमाचा आविष्कारही त्यांच्या रचनेतून स्पष्ट होतो.
प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेल्या व मालती पांडे यांनी गायलेल्या “सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोर गं’, या गीतामधून मातृत्वाच्या भावविश्वाचे दर्शन होते. तसेच “आळविते मी तुला विठ्ठला’ या प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या व माणिक वर्मा यांनी गायलेल्या गीतांमधून त्यांची विठ्ठल भक्ती प्रतीत होते. “या गडे हासू या या गडे नाचू’ या श्रीनिवास झाले यांनी संगीतबद्ध केलेल्या व सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या बालगीतांमध्ये निसर्गपण डोकावतो. “सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का’ या गीतामधून त्यांचा स्वप्नविलासही दिसून येतो.
प्राचीन काव्याबरोबर “नव-कविता’ यांची ओळख देणारे काव्यवाहिनी या संकलनातून चार खंड कवी कुसुमाग्रज व जोग यांनी संपादित केले. त्यामधे संजीवनी मराठे यांच्या चार कवितांचाही समावेश आहे. “एचएमव्ही’चे संचालक जी. एन. जोशी यांनी संगीतबद्ध केलेले “शांत सागरी कशास उठविलीस वादळे’ हे संजीवनी मराठे यांचे गीत कांचनमाला शिरोडकर यांनी गायलेले पहिलेच गाणे होते. आकाशवाणीवर आजही त्यांचे हे गीत ऐकायला मिळते. त्यांनी “साखरपुडा’ चित्रपटासाठी पद्य रचना केली होती. त्यांनी “बरं का गं आई’ आणि “नको बाई रुसू’ बालगीत संग्रहातून बालगीते प्रसिद्ध केली. त्यांच्या बालगीतांतून मुलांचे खेळकर, चंचल, निरागस भावजीवन प्रतिबिंबित झालेले दिसते.
काव्यसंजीवनी, राका, संसार, चित्रा, छाया, भावपुष्प, परिमला या सात काव्यसंग्रहातून त्यांनी जणू काव्याचे सप्तसागरच निर्माण केले. काव्यरचनेबरोबर त्यांनी लिहिलेली “ट्युलिप्सच्या देशातून’ हे पत्रसंकलन आणि “गीतांजली दर्शन’ हा काव्यानुवाद ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. बालचमूंसाठी त्यांनी इच्छामणी आणि इतर गोष्टी, गंमत, माझा भारत, मासुमा आणि इतर प्राणिकथा, लाडकी लेक (अनुवादित बालकादंबरी) ही पुस्तके लिहिली.
महाराष्ट्र शासनाने “बरं का गं आई’ व “हसू बाई हसू’ या त्यांच्या संग्रहांना पुरस्कार देऊन त्यांचा उचित गौरव केला. त्याचे 1 एप्रिल 2000 रोजी निधन झाले.