प्रेम आहे मानवी संस्कृतीचा सारांश! प्रेम कोणाच्यातरी वाटेवर डोळे अंथरणारं पर्युत्सुक मन असतं. आज #ValentineDay2023 प्रेमदिनी प्रेमाचं मन वाचू.
माणूस हा पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्राणी आहे आणि प्रेम ही या माणसाला मिळालेली सर्वात श्रेष्ठ देणगी आहे. कोणत्याही मानवेतर प्राण्यांपेक्षा वेगळे असणारे माणसाचे वैशिष्ट्यपूर्ण हात नुसते प्रेमच करत नाही तर प्रेमाच्या कविता लिहितात, चित्रे काढतात, वाद्य वाजवतात, शिल्प निर्माण करतात. कैलास लेण्यांचा निर्माता कोणाच्यातरी प्रेमात पडला असावा. ताजमहाल निर्माण करणाऱ्या कलावंतांच्या व्यक्तिगत प्रेमकहाणीवर आधारित “पत्थर का ख्वाब’. ललितकलांच्या निर्मितीचं महत्त्वाचं आणि एकमेव कारण जरी प्रेम नसलं, तरी कोणाच्यातरी प्रेमात पडल्याशिवाय काही नवं भव्य-दिव्य निर्माण करावंसं वाटतच नाही.
माणसाच्या मनात प्रेमाचं हे अद्भुत रसायन ऊर्फ “केमिकल लोच्या’ कसा तयार होतो, या विषयावर जगभरातल्या सर्व भाषांत अब्जावधी ओळी लिहिल्या गेल्या असतील. खरंच! प्रेम काय असतं? अळवावरचं मंथर पाणी असतं. तरुणपणीच्या रस्त्यावरचं पहिलं मोक्याचं ठिकाण असतं. ते डोळ्यांनी बोलली गेलेली हृदयाची भाषा असतं. प्रेम गालावरली लाली असतं. ओठांवरचा गुलाब असतं. प्रेम रेशमी केसांची माधवी असतं. तळहाताचं चुंबन असतं. ते स्पर्शाची पालवी उगवणारा वसंताचा हात असतं; मदनाने सोडलेला सुमशर असतं. प्रेम कोणाच्यातरी वाटेवर डोळे अंथरणारं पर्युत्सुक मन असतं. प्रेम संध्येचं श्यामल पाणी असतं. ते अनुपमेय असल्याने देवघरचं लेणं असतं. प्रेम नसणाऱ्याचं असणं असतं; असणाऱ्याच्या अंगीचं लेणं असतं. प्रेम एकाच जन्मामध्ये मिळणारे अनेक जन्म असतं आणि मरणाची भीक मागणारे शेकडो मृत्यू असतं. प्रेम ज्यांना मिळतं, ते वेदनेने तडफडत असतात; पण त्यांची वेदना दगडाला मिळणाऱ्या निष्प्रेम चिरंजीवनापेक्षा लाख पटींनी श्रीमंत!
तारुण्याच्या उंबरठ्यावर भेटलेलं आणि लाभलेले प्रेम म्हणजे मृगाचा पाऊस. मृगाचा पाऊस आला नाही म्हणून कोणी उशिराच्या पावसावर रागवायचं नसतं. त्याला अधिक-उणं बोलून त्याचे बहकणं, खोटं भरवसे देत राहणं, बहाणे सांगणं, वेळा चुकवणं या त्याच्या सर्व “गुस्ताखियॉं’ माफ करायच्या असतात. बेटर लेट दॅन नेव्हर. “पगला घोडा’तली नायिका आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही म्हणून आत्महत्या करते. चिता जळत असताना तिचा आत्मा भटकत असतो. तिला सभोवतालच्या गप्पांतून कळते, की आपल्या शेजारचा म्हातारा आपल्यावर मनोमन प्रेम करीत होता! हे कळताक्षणी तिचा मरण्याचा इरादा बदलतो; आता तिला जगायचं असतं. “नि:शब्द’मधला अमिताभ आत्महत्या करायला जातो, परत येतो तो जियाच्या प्रेमाच्या सुंदर आठवणी जगण्यासाठी. असं अकल्पितपणे भेटलं म्हणून काय झालं, प्रेम हे शेवटी प्रेम असतं. ते सफल नाही झालं म्हणून काय झालं, प्रेम हे शेवटी प्रेमच असतं. त्याचा ओझरता जरी परिसरस्पर्श आपल्या जीवनाला झाला, तरी उर्वरित जगण्याला ते अर्थपूर्णतः आणि हेतू प्राप्त करून देतं- कन्नड कथाकार कल्की यांच्या “पत्र’ या कथेसारखा…
एक विधवा प्रौढ स्त्री एका शाळेची मुख्याध्यापिका असते. एकेदिवशी त्या शाळेतली एक तरुण शिक्षिका तिच्याकडे तक्रार घेऊन येते, की शाळेतले शिक्षक व मुलं-मुली तिची टिंगल करतात. कारण तिचं कुणावर तरी प्रेम असतं अन् त्यांचं लग्न ठरलेलं असतं. ती मुख्याध्यापिका तिला म्हणते, “अगं, यात एवढे रागवण्यासारखं, चिडण्यासारखं काय आहे? अशा प्रसंगातून तर प्रेम वाढत असतं.’ ती तरुण शिक्षिका म्हणते, “आपणाला या प्रेमाचा काय अनुभव? तुम्ही तर कधी प्रेम केलं नाही…’ “अगं, या प्रेमातूनच मी ही शाळा उभी केली.’ “ती कशी?’ मुख्याध्यापिका सांगू लागते; “त्यावेळी मी बालविधवा होते. तरुण होते. एकदा मी एका लग्नसमारंभात गेले होते. तिथं मी एका उमद्या, सुंदर तरुणाला बघितले. तो त्या सर्व मंडळींत उठून दिसत होता. त्यानेही मला पाहिले.
आमची नजरभेट झाली. मी माझ्या खोलीकडे परतले. तिथे टेबलावर एक पत्र ठेवले होते. त्यात लिहिलं होतं, “मी तुला पसंत असेन व तुझी लग्न करण्याची इच्छा असेल तर तू दारात फुलांची एक माळ घेऊन उभी रहा. म्हणजे मी पुढील बोलणे तुझ्या आई-वडिलांशी करीन.’ त्या शिक्षिकेने उत्सुकतेने विचारले, “पुढे काय झालं मॅडम?, तुम्ही लग्न का केलं नाही?’ मुख्याध्यापिका उत्तरते, “अगं, मला ते पत्र वाचता आले नाही. त्यावेळी मी निरक्षर होते.’ अन् इथे ती कथा संपते.
प्रेमाचा स्वीकार हा प्रेमातला म्हणूनच अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. जे डोळ्यांतून, वागण्यातून थोडं बहुत कळलेलं असतं, ते शब्दांत नेमकं व्यक्त करणे खूप आवश्यक असतं. असं न करणाऱ्यांना जन्मभर “हृदयात दाटलेले हृदयात राहिले’ हे गाणं गावं लागतं. अमृता प्रीतमला “असफल प्रेमाची सफल लेखिका’ असं म्हणतात.
तिनं लिहिलं, “जिस रास्ते मेरा मन गया उस रास्ते में डोली नहीं गई’ सगळी अमरप्रेमं असफलच होती. लैला-मजनू, शिरीन-फरहाद, रोमियो- ज्युलियट, हीर-रांझा, देवदास-पारू… विफल प्रेमाची मराठीतली सुंदर कथा आहे, “कातरवेळ’ (अरविंद गोखले). प्रेमाच्या आणखी सुंदर कथा: “यही सच है’ (मन्नू भंडारी), “तलावातलं चांदणं’ (गंगाधर गाडगीळ). सुंदर कादंबऱ्या: “वाट पाहता लोचन’ (र. वा. दिघे), “ते दिवस’ (निर्मल वर्मा), “देवदास’ (शरदचंद्र चटर्जी). प्रेमाचे सुंदर चित्रपट: “टायटॅनिक’, “तीसरी कसम’, “उपहार’, “लैला मजनू’, “छोटी सी बात’, “रजनीगंधा’… प्रेम आणि मैत्री, परस्परांत मिसळणाऱ्या सीमारेषा. मैत्रीबद्दल नीरजा यांनी जे लिहिले आहे त्याला सलाम करत अरुणा ढेरे यांची ही कविता. प्रेमाविषयी आपल्या एका मित्राशी बोलताना त्या म्हणतात: “माझं अर्धवट फुललेलं बोलणं ऐकून तू हसलास, तर तू मर्द असशील, माझ्यासाठी स्वप्न धरायला धावलास तर तू प्रेमिक असशील, स्वप्न झालास तर परमेश्वर असशील, ते स्वप्न हाती देशील तर माझा पती असशील, पण-
चालशील जर माझ्यासोबत
त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे
समजून हेही की ते हाती येईल न येईल
पण अपरिहार्य माझी ओढ
माझे कोसळणे, माझे धावत जाणे
आणि माझा विश्वास
की माझे मलाच लढता येईल
तर मग तू कोण असशील?
मित्र असशील, माझ्या मित्रा