-अरुण गोखले
मला चांगले आठवतेय की, आमच्या लहानपणी तिन्हीसांजेच्या वेळी दिवे लागले की आम्ही देवासमोर बसून परवचा म्हणायचो. त्यात आठवड्याचे वार सांगून झाले की महिन्याचे दोन पक्षही सांगितले जायचे. त्यातील पहिला पक्ष म्हणजेच शुद्ध किंवा शुक्लपक्ष, तर महिन्याचा दुसरा पक्ष म्हणजेच पंधरा दिवस हा कृष्णपक्ष असे सांगितले जायचे.
पक्ष म्हणजे पंधरा दिवसांचा कालावधी. चातुर्मासातील भाद्रपद महिन्यातील दुसऱ्या पक्षातील काळ हा पितृ कार्यासाठी पितृपंधरवडा किंवा पितृपक्ष म्हणून राखून ठेवलेला काळ आहे. या कालावधीत तुम्ही आम्ही प्रत्येकानेच कृतज्ञतापूर्वक आपल्या पितृगणांचे स्मरण करून ज्या दिवशी म्हणजेच ज्या तिथीला ती व्यक्ती मृत झाली असेल त्या तिथीस त्यांचे स्मरण पूजन करावे. त्यांना तीळ अर्पण करावेत, पाणी पाजावे, नैवेद्य करावा. त्यांचे स्मरण, पूजन, तर्पण करून त्यांना संतुष्ट करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत, असे शास्त्रधर्माने सांगून ठेवलेले आहे.
त्यासाठी हा एवढा मोठा विस्तृत काळ शास्त्रधर्माने या कार्यासाठी खास राखून ठेवला आहे. ज्या तिथीस एखादी व्यक्ती मृत झाली असेल, भाद्रपद महिन्यातील त्या दिवशीच्या तिथीस त्याचे श्राद्ध करावे.
जर एखाद्या तिथीचा क्षय असेल तर किंवा मृत व्यक्तीची नेमकी तिथी दिवस हे माहीत नसेल किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी आणि तिथीस श्राद्ध करणे हे काही अपरिहार्य कारणाने शक्य नसेल तर अशी श्राद्ध ही भाद्रपद महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सर्वपित्री अमावस्येस करावीत असे सांगितले जाते.
श्राद्ध आणि श्रद्धा ह्यांचा परस्परांशी फार निकटचा संबंध आहे. विशेषकरून ही पितृकार्ये मोठ्या श्रद्धेने करणे अपेक्षित असते. कारण एका प्रकारे आपण ह्या अशा संपन्न केलेल्या श्राद्धपक्षातून त्यांच्याबद्दल आपल्या मनात असलेला आदर, प्रेम, माया, श्रद्धाही व्यक्त करीत असतो. त्यामुळेच त्या गोष्टी अगदी मनापासून करणे हेच अधिक उचित होय.
आपल्या अनेक समस्या दूर होणे, घरात शांतता राहणे, विवाहकार्यातील विलंब, अडचणी दूर होणे, घरात सुख-शांती नांदणे या सारख्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी ह्या आपल्या पितृगणाच्या आशीर्वादावरच अवलंबून असतात. त्यामुळेच काय केले ह्याहीपेक्षा ते किती श्रद्धेने केले ह्यालाच अधिक मोल असते.