पुणे : करोना काळात आम्ही सगळेच रस्त्यावर उतरून काम करत होतो; परंतु काही जण घरात बसून फेसबुक लाइव्ह करत होते. तेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहे. आपण काय बोलतो आहे, कोणाविषयी बोलतो आहे, याचा विचार केला पाहिजे. मोदींची वक्रदृष्टी पडली, तर फेसबुक लाइव्ह करणाऱ्यांना फेस येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता गुरुवारी टीका केली, तसेच हत्ती चले बाजार.. तो, असे म्हणत हे वाक्य आता तुम्हीच पूर्ण करा, असेही शिंदे म्हणाले.
महायुतीचे पुणे शहरातील उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च- तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्यासह आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेताच शिंदे यांनी टीकास्त्र सोडले, तसेच काँग्रेसवर टीका करताना त्यांचा उल्लेख अहंकारी रावण असा केला. याचा या निवडणुकीत अंत करा, असे आवाहन या वेळी केले.
गेल्या पावणेदोन वर्षांत राज्य सरकारने खूप कामे केली आहेत. त्यामुळे मतदारांपुढे जाताना तुम्हाला खाली मान घालण्याची गरज राहणार नाही. हे काम करणारे सरकार आहे. सर्वसामान्यांचे सरकार आहे. उद्योगधंदे महाराष्ट्रात आणणारे सरकार आहे. आधीच्या सरकारच्या (महाविकास आघाडी) काळात सर्व कामकाज ठप्प होते, अशी टीका शिंदे यांनी केली.
कोविडमध्ये आपण सर्व काम करत होतो. लोकांचे जीव वाचत होतो; परंतु काही लोक खिचडी, ऑक्सिजन प्लांट, बॉडी बॅग्जमध्ये भ्रष्टाचार करत होते. राज्यकर्त्यांनी कधीच अहंकार बाळगायचा नसतो. अहंकारामुळे रावण जळून खाक झाला, तसाच काँग्रेसरूपी रावणाचा अंत या निवडणुकीच्या निमित्ताने करावयाचा आहे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे. कोणीही आपला पराभव करू शकत नाही; परंतु ते गाफील राहिले, तर उमेदवाराचा पराभव महायुतीचे कार्यकर्ते करू शकतात, असे पाटील म्हणाले. अन्य नेत्यांचीही भाषणे झाली.