– माधव विद्वांस
आज प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक बाबा कदम यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म 4 मे 1929 रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. बाबा कदम यांचे पूर्ण नाव वीरसेन आनंद कदम असे होते. त्यांचे वडील अक्कलकोटच्या अक्कासाहेब महाराजांचे स्वीय सचिव होते. त्याचे बालपण त्यामुळे संस्थांनी वातावरणातच गेले. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे त्यांना त्यांचे उर्वरित शिक्षण आश्रमशाळेत राहूनच पूर्ण करावे लागले. याचवेळी त्यांना चित्रकलेची पण आवड निर्माण झाली.
अगदी लहानपणीच आईच्या आजारपणामुळे घाईगडबडीतच त्यांचा त्यांची मामेबहीण कुमुदिनी यांच्याबरोबर विवाह झाला. पुढे ते राजाराम कॉलेजमधून पदवीधर झाले. याच काळात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक बाळ गजबर यांचा परिचय झाल्याने चित्रकलेचे संस्कार त्यांच्यावर झाले. शिक्षणाची ओढ त्यांना होतीच. 1954 मध्ये ते एलएल. बी. झाले. त्यानंतर ते फौजदारी वकील डी. एस. खांडेकर यांच्याकडे ते काम करू लागले. 1959 मध्ये त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्त झाली आणि त्यांनी 1987 पर्यंत सरकारी वकील म्हणून काम केले.
वकील म्हणून काम करीत असतानाच त्यांचे लेखन सुरू झाले होते.
अगदी न्यायालयात कामकाजातून थोडा वेळ मिळाला की ते सुचलेले विचार लगेचच आपल्या वहीत नोंद करून ठेवायचे. लहानपणी वडील संस्थानिकांचे सेवेत स्वीय सहाय्यक असल्याने साहजिक राजवाड्यावर त्यांचे जाणे होत असे. तेथील शिष्टाचार, वैभव त्यांनी पाहिले होते. सेवक, राजघराण्यातील व्यक्ती व वाड्यावर येणाऱ्या पाहुण्यांच्या वागण्यातील लकबी सरंजामी बोलीभाषा त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या कथालेखनात झाला. त्यांचे वडील रेसकोर्सवर अधिकारी म्हणूनही काम करायचे, तसेच बाबा स्वतः फौजदारी वकील असल्याने न्यायालयाचे कामकाज तसेच गुन्हेगारांच्या क्लृप्त्या व पोलिसी खाक्या त्यांच्या परिचयाचा होता, त्यामुळे त्यांच्या गुन्हेगारीविषयीच्या लेखनात नैसर्गिकता जाणवते. त्यांना शिकारीचा नाद होता. त्यामुळे त्यांच्या शिकारकथामध्ये जंगलातील वातावरणाचे त्यांनी घेतलेले अनुभव त्यांच्या लेखनातून जंगलात नेऊन उभे करतात.
1965 मध्ये त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यांच्या “प्रलय’ कादंबरीवर पुढे “देवा शपथ खरं सांगेन’ हा चित्रपटही निघाला. 1966 मध्य “इन्साफ’ या कादंबरीवर “अधिकार’ हा चित्रपट निघाला. त्यांची “सन्ना’ ही खिसेकापू तरुणीवरील, “अजिंक्य’ ही रेसवरील, “राजधानी’ ही संस्थानिकांसंबंधित, “शोभा’ ही वेश्येवरील, “वसंतदादा व शालिनीताईंच्या जीवनावरील “निर्मला’, पद्मा चव्हाण यांच्यावरील “अभिनेत्री’, बापू बिरू वाटेगावकरांच्या जीवनावर “दगा’, तसेच स्वत:च्या बालपणाच्या आठवणीवर “शाळा सुटली, पाटी फुटली’ अशा कितीतरी वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी लेखन केले.
त्यांनी शिकारकथा, रहस्यकथा यांच्या बरोबरीने, अनुभवामृत, साक्षात्कार, ज्ञानदेवांचे भावदर्शन, ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान, वेदांतीय परिभाषा असे आध्यात्मिक विषयावरही लेखन केले. कथा, कादंबऱ्यांबरोबर वृत्तपत्रातून व्यक्तिचित्रणात्मक लेखमालाही त्यांनी लिहिल्या. बाबांनी पत्नी कुमुदिनी यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले, त्यामुळे त्या एम.ए. पर्यंत शिकल्या. त्यांनी “जीवनगाणे’ हे आत्मचरित्रही लिहिले आहे. बाबा कदम यांचे निधन 9 ऑक्टोबर 2009 रोजी झाले.