कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा घोळ आता अशक्य पातळीवर पोहोचला आहे. एक तर मुळातच पक्षाच्या अध्यक्षीय निवडणुकीला कमालीचा विलंब झाला आहे. आता विलंबाने का होईना, प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे आणि पक्षश्रेष्ठींचा अध्यक्षपदाचा उमेदवारही निश्चित झालेला असताना सगळे काही सरळपणे पार पडेल अशी अपेक्षा होती. पण येथेही भलतेच नाट्य उभे राहिले आहे.
कॉंग्रेसश्रेष्ठींनी अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्या पारड्यात आपले वजन टाकले होते व त्यांना ही निवडणूक लढवण्यासाठी राजीही केले होते. त्यानुसार आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची अधिकृत घोषणाही गेहलोत यांनी केली होती. पण त्यांचा जीव राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदात अडकल्याने मोठे नाट्य निर्माण झाले, त्यातून कॉंग्रेसची तर अप्रतिष्ठा झालीच; पण ज्या गेहलोत यांच्याविषयी जे समज निर्माण झाले होते त्याचेही बिंग फुटले आहे. अशोक गेहलोत हे ज्येष्ठ आणि प्रगल्भ नेते आहेत, ते कॉंग्रेसचे निष्ठावान आहेत आणि गांधी परिवाराच्या विश्वासातील आहेत अशी त्यांच्याविषयीची काही गृहीतके प्रचलित होती. त्यामुळे ते आपल्या राज्यातील सत्तांतरही सहज कुशलतेने पार पाडतील आणि पक्षाध्यक्षपद ही मोठी जबाबदारी ते निष्ठेने सांभाळतील अशी अपेक्षा होती. ही अपेक्षा गेहलोत यांनी साफ धुळीला मिळवली आहे. राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नाही या इराद्याने त्यांनी ज्या खेळ्या केल्या त्या त्यांच्या इमेजला शोभणाऱ्या नव्हत्या; एकूणच हा सारा प्रकार किळसवाणा ठरला. त्यातून गेहलोत यांची इभ्रत तर गेलीच; पण कॉंग्रेसने त्यांच्यात जी महानता पाहिली होती तीही धुळीला मिळाली आहे.
वास्तविक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद ही ऐतिहासिक स्वरूपाची जबाबदारी आहे. या पदावर आतापर्यंत दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनजी, गोपालकृष्ण गोखले. मदनमोहन मालवीय, मौलाना अबुल कलाम आझाद, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा इतिहास पुरुषांनी काम केले आहे. त्या पदावर बसण्याची महान संधी अशोक गेहलोत यांना चालून आली होती. पण त्यांना या पदापेक्षा राजस्थानचे प्रादेशिक राजकारणच अधिक महत्त्वाचे वाटले. आपल्याच गटाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी गेहलोत यांनी जी धडपड केली ती केविलवाणी होती. आधी तर हे महाशय राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडून अध्यक्षच व्हायला तयार नव्हते. त्यांना कसेबसे तयार केल्यानंतर त्यांनी आपण दोन्ही पदे सांभाळू अशी भूमिका घेतली. पण पक्षातील “एक व्यक्ती एक पद’ या धोरणानुसार त्यांना दोन्ही पदे कायम ठेवता येणार नाहीत, असे सांगितल्यानंतर ते मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार झाले; पण आपला उत्तराधिकारी आपल्याच मर्जीतील असावा यासाठी ते अडून बसले. त्यांच्या या भूमिका कॉंग्रेसच्या भावी अध्यक्षाला शोभणाऱ्या नव्हत्या. खरे तर त्यांच्या भूमिका थिल्लर स्वरूपाच्या होत्या असेच म्हणावे लागेल.
सत्तालोलुपता गेहलोत यांना लपवता आली नाही. त्यासाठी त्यांनी आपल्यातील प्रगल्भता, निष्ठा वगैरे बाबींना रितसर तिलांजली दिली. गेले तीन-चार दिवस हा सारा तमाशा सुरू आहे. तो सोडवण्यासाठी आणि विधिमंडळ कॉंग्रेस सदस्यांशी चर्चा करण्यासाठी केंद्राचे निरीक्षक राजस्थानात पाठवावे लागले. पण गेहलोत यांच्या समर्थक आमदारांनी त्यांची भेटच घेण्यास नकार दिला. त्यांनी परस्पर दुसरीकडेच बैठक घेऊन जवळपास बंडच पुकारले. विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन 90 हून अधिक गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनामाही देण्याची तयारी दर्शवली. या साऱ्या घडामोडींमुळे राजस्थानातील कॉंग्रेसची सत्ता टिकते की जाते अशी टोकाची स्थिती निर्माण झाली. गेहलोत समर्थक आमदारांनी हा प्रकार गेहलोत यांच्या संमतीशिवाय केला असेल असे कोणीही मान्य करणार नाही. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना, माझ्या हातात आता काहीही राहिलेले नाही, असे विधान गेहलोत यांनी करणे हा प्रकारही अचंबित करणारा होता. अशा स्वरूपाच्या घटनांमुळे पक्षाचीच नव्हे तर आपलीही अप्रतिष्ठा होते आहे, याचे भानही गेहलोत यांना राहिले नाही.
गेहलोत यांच्यासारखा प्रगल्भ नेता इतक्या क्षुद्र स्वरूपाचे राजकारण कसे करू शकतो याचे अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नसेल. या सर्व पार्श्वभूमीवर दोन-चार बाबी अत्यंत ठळकपणे लक्षात येण्यासारख्या आहेत. एक तर मुळात गेहलोत यांना पक्षाध्यक्ष पदापेक्षा राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदातच अधिक रस आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांना बळेच घोड्यावर बसवण्यात अर्थ नव्हता. मुळात त्यांच्याशी या पदाबाबत खासगीत स्पष्ट बोलणे करून राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय गुप्तपणे मार्गी लावता आला असता, पण पक्षाच्या धुरिणांनी तेही काम केले नाही. पक्षांतर्गत वाद यातून चव्हाट्यावर येईल आणि पक्षाची अप्रतिष्ठा होईल याचा अंदाज पक्षश्रेष्ठींना आधीच यायला हवा होता, पण त्यांनी अनभिज्ञता दाखवली, याचेही आश्चर्य वाटल्याखेरीज राहात नाही.
सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांना समोरासमोर बसवून पक्षांतर्गत विषय मिटवणे सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांना अशक्य नव्हते किंवा त्यांनी या बाबतीत आपला स्पष्ट निर्णय दोघांना खासगीत कळवला असता तर त्यांच्या निर्णयाबाहेर जाण्याची दोघांपैकी कोणीही हिंमत केली नसती. इतकी स्पष्ट स्थिती असताना पक्षश्रेष्ठींनीही राजस्थानातील या दोन्ही गटांना आपसात झुंजवले. झाल्या प्रकाराबद्दल आता गेहलोत हे माफी मागत आहेत, पण त्याचा आता काही उपयोग नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने गेहलोत यांना राजस्थानबाबत स्वत:च्या अधिकारातच काही निर्णय घेता आले असते आणि आपल्या राज्यातील आपल्या समर्थकांचे हित जपता आले असते. पण दुर्दैवाने गेहलोत यांच्याकडून ज्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडले आहे त्यातून आधीच गलितगात्र झालेल्या कॉंग्रेसची स्थिती आणखीनच बिकट झालेली पाहायला मिळाली आहे.
वास्तविक राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भरभरून प्रतिसाद मिळत असताना पक्षासाठी जरा बरे वातावरण निर्माण झाले होते; पण त्याचा इम्पॅक्टही या प्रकारातून नाहीसा झाला आहे आणि पक्षांतर्गत लोकशाहीच्या प्रदर्शनाचा प्रयत्नही कॉंग्रेसला महागात पडला आहे.