अन्नप्रश्न सोडविण्यासाठी डॉ. लोहिया यांची योजना
कालिकत, ता. 17 – अन्नसमस्या सोडविण्याच्या कार्यक्रमातील एक भाग म्हणून सरकारने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत 100 कोटी रुपयांची, दुष्काळी भागात मोफत अन्नछत्रे चालविण्यासाठी तरतूद करावी अशी सूचना समाजवादी पक्ष नेते डॉ. लोहिया यांनी केली आहे.
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत अन्नपुरवठ्यासाठी 2700 कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यादृष्टीने आणखी 100 कोटी काही वावगे नाहीत असे सांगून डॉ. लोहिया यांनी पुढील चार कलमी कार्यक्रम सुचविला आहे. 1) अन्नोत्पादन वाढविण्यासाठी अन्नसेना उभारणे. 2) दुष्काळी भागात अन्नछत्रे उघडणे. 3) अन्नधान्याच्या किमतींवर नियंत्रण घालणे व 4) बिनकिफायतशीर जमीनवर सारा न घेणे. डॉ. लोहिया यांनी समाजवादी पक्षाचे सभेत बोलताना ही योजना मांडली.
40 शतकांपूर्वीची गाडी
मॉस्को – इसवी शतकापूर्वीच्या 19व्या शतकातील एका गाडीचे अवशेष जॉर्जियामध्ये पुराणवस्तु संशोधक ओ. जापारिटझे यांना सापडले आहे. अशाच प्रकारच्या आणखी काही गाड्या सोव्हियत युनियनमध्ये इतरत्रही आढळल्या आहेत. त्यापैकी तीन गाड्या आर्मेनियात आढळल्या आहेत. त्या इसवी शतकापूर्वीच्या 12व्या व 13व्या शतकातील आहेत.
या गाड्यांची रचना अत्यंत पुराणयुगीन अशी आहे. ह्या गाड्या जॉर्जियाच्या कला-संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. या गाड्यांना साफसूफ केल्यानंतर 4000 वर्षांमागे त्या जशा होत्या तशाच त्या आता दिसत आहेत.
जमीन मालकी जनतेचीच
गांगद – जमिनीच्या प्रश्नाची सोडवणूक ही देशाच्या सर्वांगीण प्रगतीची गुरूकिल्ली आहे. जमिनीच्या गुंतागुंतीचा प्रश्न सरकारी प्रयत्नापेक्षा सहकार्यानेच सुटणार आहे, असे आज येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नेहरू व आचार्य विनोबा भावे यांनी सांगितले.
नेहरू म्हणाले, की जमिनीची मालकी जनतेकडे-पंचायतीकडे असली पाहिजे, या आचार्यांच्या मताशी मी सहमत आहे. विनोबांनी देशासमोर फार मोठा आदर्श ठेवला आहे. ग्रामपंचायती बलिष्ठ केल्या पाहिजेत व जीवनाच्या सर्व अंगांना अंतर्भूत करतील असे सहकारी संघ स्थापले पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी लोकांनी कष्ट करणे आवश्यक आहे.