रंतिदेव हा एक शुद्ध निर्मळ चारित्र्याचा, शुद्ध मनाचा आणि सर्वाभूती परमेश्वराचे अस्तित्व मानणारा एक सहृदयी राजा. या राजाने त्याची सर्व राजकर्तव्ये व्यवस्थित पार पाडल्यावर आपल्या राज्य कारभाराची सूत्रे आपल्या मुलाच्या हाती दिली. तो स्वत: मात्र दूर वनात ईश्वर साधना करून जन्म सार्थकी लावण्याच्या विचाराने गेला.
एकदा या राजास त्याची ईश साधना चालू असताना खायला अन्न तर सोडाच; पण साधे पाणीही अनेक दिवस प्यायला मिळाले नाही. एके दिवशी त्यास त्याच्या भाग्याने तूप रोटी, थोडी फार फळे, मिठाई आणि पाणी या वस्तू एक दाता देऊन गेला.
तो क्षुधित राजा रंतिदेव आता भोजन करणार तोच त्याच्या समोर एक ब्राह्मण याचक आला. त्याने त्या ब्राह्मणास आपल्याकडची तूप रोटी दिली. त्या विप्र अतिथीस तृप्त केले. तृप्तीची ढेकर देऊन राजास आशीर्वाद देऊन तो ब्राह्मण निघून गेला. तोच एक भूकेला शुद्र अतिथी त्याच्या जवळ आला. “मला काही तरी खायला दे’ म्हणून प्रार्थना करू लागला. तेव्हा त्या रतिदेव राजाने आपल्याकडे असलेली फळे आणि मिठाई त्या भूकेल्या जीवास दिली, आणि त्याचीही भूक भागविली.
थोड्या वेळात तिथे एक कुत्रा आला. तो राजाकडे आधाशी नजरेने पाहू लागला. तेव्हा त्या राजाने स्वस्त:साठी राखलेला रोटीचा अर्धाभागही त्या कुत्र्यास दिला. आता खायच्या वस्तू तर संपल्या. निदान आहे ते पाणी प्यावे म्हणून त्याने पाण्याचे भांडे तोंडास लावले तोच एक चांडाळ तिथे आला. त्याने रंतिदेवाकडे पाणी मागितले. तेव्हा त्या सहृदयी रंतिदेवाने सर्वाभूती सर्वेश्वर म्हणून जसे आता अन्न वाटून टाकले तसेच त्याने या चांडाळास पाणीही दिले. त्या चांडाळाने सर्व पाणी पिऊन ते रिकामे भांडे रंतिदेवाच्या हाती दिले.
भूकेच्या वेळी पुढे आलेले अन्न आणि तहानेच्या वेळी पुढे आलेले पाणी यातले काहीही प्रत्यक्षात त्या सहृदयी रंतिदेव राजास मिळाले नव्हते. त्या परिस्थितीत त्या राजाचे पोट रिकामे असले तरी त्याचे मन मात्र एका आगळ्या वेगळ्या आनंदाने, कर्तव्यपूर्तीने आणि समाधाने भरले होते. खऱ्या अर्थाने त्यास समाधानाची ढेकर आली. स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करण्याची आदर्श कृती रंतिदेव राजाने प्रत्यक्ष जीवनात केली.