-अरुण गोखले
ज्या व्यक्ती खरोखरच मानवता, भूतदया, समाजप्रेम, लोककल्याणाच्या कार्यांनी भारावलेल्या आहेत, त्या व्यक्ती त्यांना अल्पकालीन मिळालेल्या संधीचे कसे सोने करतात आणि लोकमानसावर कसे राज्य करतात याची साक्ष देणारा श्रावण महिन्यातला षष्ठीचा दिवस म्हणजेच “श्रीयाळषष्ठी’.
असे सांगितले जाते की चौदाव्या शतकात श्रीयाळ शेठ नावाचा एक व्यक्ती होऊन गेला. ते मनाने मोठे उदार आणि लोकसेवेस सदैव तत्पर होते. एकदा त्यांच्या नगरीत मोठा दुष्काळ पडला. लोकांना प्यायला पाणी मिळत नव्हते. धान्य पिकत नव्हते. लोकांची मोठी उपासमार आणि अत्यंत हाल होत होते. त्यावेळी श्रीयाळ यांनी त्यांच्याकडील हजारो बैल महाराष्ट्र आणि गुजरात या दोन प्रांतात फिरते ठेवून जिथे जिथे आवश्यकता होती तिथे तिथे त्यांनी लोकांसाठी अन्नधान्याचा पुरवठा करून लोकांचे जीव वाचविले. खरे तर हे सारे केवळ समाजसेवा, जनता जनार्दनाची सेवा म्हणून ते करीत होते. त्यांना कोणत्याच मान-सन्मानाची गरज किंवा अपेक्षा नव्हती.
त्याकाळी राज्य करणाऱ्या बादशहाच्या कानी हे वृत्त गेले. बादशहाने श्रीयाळ शेठास आपल्याकडे बोलावून घेतले आणि “तुला माझ्याकडून काय हवे, ते माग. ते मी देतो’, असे सांगितले. यावर श्रीयाळ यांनी केवळ औटघटकेसाठी त्या राज्याचे अधिकार आपल्याकडे मागून घेतले. बादशहाने दिल्या शब्दाप्रमाणे त्यांस केवळ औटघटकेचा राजा केले.
त्याबरोबर त्या अल्पकालावधित त्यांनी पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी जी देवस्थाने, धार्मिक संस्था बंद केल्या होत्या त्या मुक्त केल्या. त्यांना वार्षिक आर्थिक मदत ठरवून दिली. अडकून राहिलेल्या समाजाभिमुख कार्यास मान्यता दिली. आपली वेळ पूर्ण होताच या निर्णयात पुन्हा कोणताच बदल होऊ नये, अशी बादशहास विनंती करून ते औटघटकेचे राज्याधिकार बादशहास परत दिले.
निःस्वार्थ वृत्तीने संधी असूनही स्वत:साठी काहीही न मागणाऱ्या त्या लोककल्याणकारी खऱ्या लोकनेत्याचा बादशहाने गौरव केला. त्या श्रीयाळ शेठची आठवण म्हणून हा दिवस गावोगावी त्यांची प्रतिमा तयार करून आदराने पूजन करून हा दिवस मोठ्या आनंद आणि उत्साहाने “श्रीयाळषष्ठी’ म्हणून साजरा केला जातो.