दसरा-दिवाळीचे दिवस म्हणजे वर्षातला सगळ्यात मोठा उत्सवकाळ. या काळात व्यावसायिकांची उलाढाल वाढून त्यांना अधिक नफा मिळतो, तसेच नोकरदारांना बोनस मिळतो. यापुढे बाजारपेठेतली गर्दी वाढत जाईल; पण तरीही व्यावसायिकांना गर्दी कमीच आहे, असं वाटत राहील.
“स्लॅक आहे राव..! मार्केट पूर्वीसारखं राहिलं नाही,’ असं व्यापारी मंडळी बोलताना दिसतील. असा तक्रारीचा सूर लावण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे ऑनलाइन शॉपिंग साइट्स आणि त्यांच्याकडून दसरा-दिवाळीच्या निमित्तानं जाहीर झालेले बंपर सेल! भारतीय ग्राहकांचं वैशिष्ट्य म्हणजे, “आजच दसरा, आजच दिवाळी’ अशी ज्याची आर्थिक परिस्थिती वर्षभर असते, अशा माणसाचा कानसुद्धा “डिस्काउंट’ शब्द ऐकायला आतूर झालेला असतो. बऱ्याच ग्राहकांना ऑनलाइन खरेदीची सवय झालेली नसते; पण तरीही जणूकाही सगळं ठाऊक असल्याच्या आविर्भावात ते जोरदार खरेदी सुरू करतात.
ई-कॉमर्सचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म कोविडच्या काळात सर्वाधिक वापरले गेले. घरबसल्या वस्तू मिळणं ही त्या काळातली गरजच होती. परंतु त्यावेळी आपल्याला कोंडून घातल्याचा त्रास ज्यांना सर्वाधिक होत होता, तेच कोविडोत्तर काळातही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करण्यात आघाडीवर असल्याचं दिसून येतंय. परिणामी, ऑनलाइन बाजारपेठ पारंपरिक बाजारपेठेच्या तुलनेत अधिक फुलत चाललीये आणि येत्या एक-दोन वर्षांत जवळजवळ निम्मी म्हणजे 47 टक्के खरेदी याच बाजारातून केली जाईल, असं जाणकार सांगताहेत.
अर्थात, महागड्या वस्तूसाठी ऑनलाइन पन्नास हजार रुपये भरून जर “कपडे धुण्याचा साबण’ घरी पोहोचत असेल, तर काय करायचं हे सांगण्याचं काम सर्वांत आधी व्हायला हवं होतं. सातत्यानं ऑनलाइन खरेदी करणारे “ओपन बॉक्स डिलिव्हरी’ नावाची एक संकल्पना सांगतील. परंतु नवख्या माणसाला ती माहीत नसते. “ओपन बॉक्स’ म्हणजे डिलिव्हरी घेऊन कंपनीचा एक्झिक्युटिव्ह घरी आला, की त्याच्या समोरच बॉक्स उघडायचा आणि आतील वस्तू दिलेल्या ऑर्डरबरहुकूम आहे की नाही, हे पाहायचं. वस्तूमध्ये तूट-फूट झालीये का, एखादा सुटा भाग मिसिंग आहे का, हेसुद्धा नीट पाहायचं असतं. परंतु आयआयएम अहमदाबादमध्ये शिकत असलेल्या एका युवकाच्या वडिलांना “ओपन बॉक्स डिलिव्हरी’ची संकल्पनाच ठाऊक नव्हती.
मुलानं वडिलांसाठी मागवलेला पन्नास हजारांचा लॅपटॉप डिलिव्हर करून एक्झिक्युटिव्ह निघून गेला आणि बॉक्स उघडल्यावर आत कपड्याच्या साबणाची वडी सापडली. कंपनी नामांकित असूनसुद्धा चूक मान्य करायला कंपनीचा कस्टमर केअर विभाग तयार नाही, अशी परिस्थिती. “घेतानाच बघून का नाही घेतलं,’ असं कंपनीचं म्हणणं. ते खरंही आहे; पण मुळात लॅपटॉपऐवजी साबण आलाच कसा? आणि वस्तू बघूनच घ्यायचीय, तर दुकानातून घेणंच चांगलं नाही का? हे दोन प्रश्न शिल्लक उरतातच!
ई-कॉमर्सचा आवाका वाढत चाललाय आणि लवकरच ती बाजारपेठ मूळ बाजारपेठेपेक्षाही मोठी होईल, हे जसं वास्तव आहे तसंच ई-कॉमर्सविरोधात होत असलेल्या तक्रारींमध्ये तब्बल सहापट वाढ झालीये, हेही रोकडं वास्तव आहे. ग्राहकांसाठीच्या राष्ट्रीय हेल्पलाइनला मिळणाऱ्या 48 टक्के तक्रारी ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात आहेत. कोविडपूर्वकाळात हेच प्रमाण आठ टक्के होतं. ई-कॉमर्स कंपन्या जसजशा मोठ्या होतील, तसतसा ग्राहक हा व्यक्तीविशेष त्यांच्यासाठी अधिकाधिक दुय्यम होत जाईल, हे सांगायला ज्योतिषी कशाला?