दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश ही चार नावे आज आपल्या स्मृतिपटलावरून नाहीसे होतात की काय असे दिसते आहे. कारण, आज किमान पाच ते नऊ वर्षांनंतरही ते चौघे मूकपणे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत… निःशब्द…
बरोबर नऊ वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवणारी घटना पुण्यात घडली. 20 ऑगस्ट 2013 या दिवसाची सुरुवातच अत्यंत धक्कादायक घटनेनं झाली होती. पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तेव्हा राज्यात आणि देशात कॉंग्रेस सरकार होतं. मात्र, एक वर्षाच्या आत दोन्ही ठिकाणी भाजप सरकारं आलं ते आजतागायत.
डाव्या आणि उजव्या विचारांची सत्तेची वाटचाल हिंसेतूनच होत असते हा इतिहास आहे. दाभोलकरांची हत्या ही याच प्रकारातली पहिली, तर कर्नाटकात पत्रकार गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी हत्या चौथी! बंगलोरमध्ये! या दोन हत्यांच्या मध्ये झालेल्या इतर दोन हत्या! 20 फेब्रुवारी 2015 दाभोलकरांची हत्या ज्या पद्धतीने झाली त्याच पद्धतीने कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली, तर कर्नाटकात 30 ऑगस्ट 2015 रोजी धारवाड येथे विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची त्यांच्याच घरात एका व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली. दोन हत्या महाराष्ट्रात तर दोन शेजारील कर्नाटकात! हत्या झालेल्या चारही व्यक्ती एकाच विचारसरणीच्या! अतिरेकी हिंदुत्ववादी, अंधश्रद्धेच्या विरोधात! चौघांनाही धमक्या आलेल्या! चौघांच्याही हत्येची पद्धत जवळपास सारखीच! मोटरसायकलवरून दोघा-तिघांनी येऊन त्यापैकी एकाने फायरिंग करणे आणि दुसऱ्या व्यक्तीने मोटरसायकल सुरू ठेवून वाट काढून पळ काढणे.
डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा तपास होऊन खटला सुरू व्हायला 2021 साल उजाडावं लागलं. सप्टेंबर 2021 मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयाने पाच आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि हा खटला सुरू झाला. पाच जणांमध्ये डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळस्कर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांचा समावेश आहे. डॉ. दाभोलकर आणि त्यांच्यानंतर झालेल्या गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि त्यांच्यापर्यंत तपास यंत्रणा कधी पोहोचणार?
2015 साली पानसरे यांची हत्या झाली. त्यानंतर कलबुर्गी आणि 2017 साली गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्या. गौरी लंकेश यांच्या केसमध्ये परशुराम वाघमारे नावाच्या शूटरला अटक झाली. त्याच्याकडून जी माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी 2018 साली नालासोपाऱ्यात वैभव राऊत याच्याकडून शस्त्रसाठा जप्त केला. त्याचा तपास करताना शरद कळस्करपर्यंत महाराष्ट्र एटीएस पोहोचले.
कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर मॉर्निंग वॉकला जात असताना 16 फेब्रुवारी 2015 रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. उपचार सुरू असताना काही दिवसांनी कॉम्रेड पानसरे यांचे निधन झाले.
धारवाडमधील कल्याणनगर परिसरात घर आहे. रविवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास दुचाकीवरून दोन जण तेथे आले. कलबुर्गी यांच्या घराचे दार त्यांनी ठोठावले. कलबुर्गी यांनी दार उघडले असता त्या दोघांनी कलबुर्गी यांच्यावर नेम धरून दोन गोळ्या झाडल्या. कलबुर्गी जागेवरच कोसळले. त्यासरशी दोघे मारेकरी तेथून पसार झाले. कलबुर्गी यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलात दाखल करण्यात आले; मात्र तेथे उपचारांना दाद न देता त्यांनी प्राण सोडले.
पत्रकार गौरी लंकेश यांनी ख्यातनाम इंग्रजी दैनिकात काम केलं होतं. त्यांचा विवाह टाइम्सचे अमेरिका प्रतिनिधी चिदानंद राजघाटा यांच्याशी झाला होता. पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. 5 सप्टेंबर 2017 रोजी अज्ञात मारेकऱ्यांनी राजराजेश्वर नगरातील त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून त्यांची हत्या केली. मृत्यूपूर्व काळात त्यांनी धार्मिक जहालमतवादी लोकांवर टीका केली होती. त्या आधीही गौरी लंकेश यांनी धार्मिकवाद आणि जातीयवादी विचारांच्या संघटनाच्या विरुद्ध अनेक प्रकारे लिखाण करून आवाज उठवला होता. त्यामुळे रामचंद्र गुहांसारख्या अनेक राजकीय विश्लेषकांनी गौरी लंकेश यांच्या हत्येला तथाकथित कारणीभूत असल्याचे प्रतिपादन केले.
गौरी लंकेश यांच्याकडे उजव्या विचारसरणीचा विरोध करणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून पाहिले जायचे. गौरी या उजव्या विचारसरणीमधील हिंदुत्वाच्या राजकारणाच्या कट्टर समीक्षक होत्या. 2003 मध्ये त्यांनी बाबा बुदन गिरी येथे स्थित गुरू दत्तात्रेय बाबा बुदन दर्गाहचे हिंदूकरण करण्याच्या कथित प्रयत्नांना विरोध केला. 2012 मध्ये मंगळुरूमधील जातीय गटांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी आंदोलनात भाग घेत असताना, त्यांनी सांगितले की धर्म नसून समाजातील पदानुक्रमाची व्यवस्था आहे ज्यामध्ये स्त्रियांना द्वितीय श्रेणीतील प्राणी मानले जाते. त्यांनी लिंगायत समुदायासाठी अल्पसंख्याक धर्माच्या टॅगचे समर्थन केले आणि कोमू सौहर्दा वेदिकेचे नेतृत्व केले, जे अत्याचारित समुदायांसाठी जातीय सलोखा मंच आहे.
या चार हत्या आणि नालासोपारा येथे सापडलेला शस्त्रसाठा या साऱ्या प्रकरणांचा खरे तर एकत्रित आणि कसून तपास होण्याची गरज होती. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने तशी आवश्यकता व्यक्त केली होती. मात्र, आपल्या बहिणीच्या हत्येचा तपास या इतर तीन हत्यांशी जोडू नये, अशी याचिका आता पत्रकार-संपादक गौरी लंकेश यांच्या बहिणीने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. प्रत्यक्षात गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करताना काही दुवे मिळाल्यामुळे डॉ. दाभोलकर तसेच पानसरे यांच्या हत्यांचा तपास पुढे सरकला होता, तरीही इतका विलंब झाला आहे.
आज या हिंसक घटना घडून कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त नऊ वर्षे झाली तरीही यापैकी एकाही हत्येत कोणालाही शिक्षा झालेली नाही. अजूनही हे खटले कनिष्ठ न्यायालयातच आहेत. म्हणजे कनिष्ठ न्यायालयात शिक्षा झाली तरीही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत अजून किमान दहा वर्षे! अर्थात, हा न्याय नव्हे. या चारही हत्यांचे धागेदोरे एकत्र गुंफलेले असलेले जाणवतात.
चार खून आणि नालासोपाऱ्याची केस या पाच प्रकरणांत काही लोक समान आहेत. चार्जशीटमध्ये उल्लेख केलेला आहे की डॉ. दाभोलकरांची हत्या ही एका व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे. डॉ. तावडे 2016 सालीच पकडले गेले आहेत. अर्थात, खटल्याला एवढा वेळ लागण्यास आजवरची महाराष्ट्र आणि कर्नाटकातील राज्य सरकारे; तसेच केंद्रातील सरकार या दिरंगाईला जबाबदार आहेत. या चारही खटल्यांचा लवकरात लवकर निकाल लागावा हीच अपेक्षा!