घटनादुरुस्तीच्या तरतुदी सेफ्टी व्हॉल्वप्रमाणे
नवी दिल्ली, दि. 27 – राज्यघटना जर ताठर असेल, तर हिंसक स्वरुपाचे बदल होण्याची नेहमी शक्यता असते; त्यामुळे घटनादुरुस्तीच्या तरतुदी या “सेफ्टी व्हॉल्व’प्रमाणे आहेत, असे उद्गार कायदामंत्री हरिभाऊ गोखले यांनी काढले.
भारतीय राज्यघटनेपुरते तरी मी सांगतो की, तीमधील कोणताही भाग दुरुस्त करण्याचा अधिकार संसदेला आहे, याबाबत कोणताही संदेह नाही. संसद सार्वभौम नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. कायदेविषयक सार्वभौमत्व संसदेचेच आहे, असेही गोखले म्हणाले.
कॉंग्रेसचा संपूर्ण इतिहास लिहिण्याची योजना
नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाचा 5000 पानी इतिहास लिहिण्याची 10 वर्षांची योजना पक्षाने आखली आहे. या योजनेतील पहिल्या तीन वर्षांसाठी 5 लाख रुपये खर्च येणार असून आवश्यक माहिती जमविण्यास सुरुवात झालेली आहे.
या कामाच्या देखरेखीसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये अध्यक्ष डी. के. बारुआ आणि “स्पिरीट ऑफ इंडिया’ या ग्रंथाचे संपादक बी. एन. पांडे यांची नियुक्ती केली आहे. एकोणिसाव्या शतकातील पक्षाच्या इतिहासाची माहिती देणारा पहिला खंड पुढील वर्षी प्रसिद्ध होईल.