पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर आणि उपनगरांमधील अनेक भागातील नागरिकंची घरे हायटेन्शन विद्युत लाइनच्या जवळपास किंवा त्याच्या खालीच बांधण्यात आलेली आहेत. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या हायटेन्शन वायरखाली अनेकांनी आपले संसार थाटले असून स्वस्त मिळतो म्हणून गुंठा, अर्धा गुंठा जागा घेऊन घरे बांधली आहेत. त्यामुळे येथील शेकडो कुटुंबावर हायटेन्शची टांगती तार कायम आहे.
चिंचवडेनगर, बिजलीनगर या परिसरासह शहरातील अनेक भागात हायटेन्शन विद्युत लाइनने अनेकांचे टेन्शन वाढविले आहे. प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे यातून दिसून येते. रोजगार, नोकरी, व्यावसायानमित्त राज्याच्या कानाकोपऱयातून अनेकजण पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आलेले आहेत. त्यामुळे गुंठा, अर्धा गुंठा जागा घेत अनेकांनी आपले संसार थाटले.
हायटेन्शनखालची जागा स्वस्तात मिळाल्याने अनेकांनी थेट हायटेन्शन लाइनखालीच घरे बांधली. भूखंडांचा विकास करताना हायटेन्शन लाइन खालील भाग वगळने अपेक्षित असते. मात्र, ते झाले नाही. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात भूमिगत केबल टाकण्यात आले. मात्र, काही ठिकाणी हायटेन्शन लाइन भूमिगत करण्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्यामुळे काही भागात हायटेन्शन लाइन जशाच्या तशाच आहेत. बिजलीनगर, चिंचवडेनगर येथील घरे हायटेन्शन लाइनच्या प्रभावाखाली आहेत. तेथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून तेथे वास्तव्यास आहेत. अनेकदा काही दुर्घटना घडली की, त्याची तीव्रता समोर येते. कालांतराने ते विसरले जाते.
आजही खांब रस्त्यावर
२००४ मध्ये १२ गावांचा महापालिकेत समावेश झाला. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहराला विजेची मोठी गरज ओळखून हायटेन्शनचे शहरात जाळे निर्माण झाले. शहराजवळ गावे आल्याने येथे शेतीमध्ये ले आउट पाडण्यात आले. अनेकांनी शहराजवळ असल्यामुळे भूखंड घेतले. शहरातील अनेक भागात आजही शेकडो खांब रस्त्यावर आहेत. काढण्याचे काम पूर्वी महापालिका स्वखर्चाने करीत होती. मात्र, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊ लागल्याने आता केवळ अत्यावश्यक आहे, त्याच ठिकाणी महापालिका स्वखर्चातून भूमिगत केबल टाकण्याचे काम करते. चिंचवडेनगर, बिजलीनगर आदी परिसर प्राधिकरणात मात्र या जमिनी प्राधिकरणाने ताब्यात घेतल्या नाहीत. त्यामुळे जमीन मालकांनी या जागा परस्पर विकल्या.