मंत्र्यांचे कांद्याच्या भाववाढीवरील वक्तव्य दिशाभूल करण्याचा आरोप
नवी दिल्ली : देशात सध्या कांद्याच्या भावाने सर्वत्र एकच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता चांगलीच त्रस्त झाली आहे. दरम्यान, याच कांद्याचे वाढते भाववाढ नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकारला अपयश आले असून यावरून सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप करण्यात येत आहे. याच आरोपांतर्गत केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याविरुद्ध एका व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील न्यायालयात राजू नय्यर यांनी न्यायधंडाधिकाऱ्यांकडे पासवानांविरोधात फौजदारी तक्रार केली आहे. या तक्रारीवर 12 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
मिठनपुरात राहणारे राजू नय्यर यांनी ऍड. मनोजकुमार सिंग यांच्यामार्फत तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे पासवनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीवर कांद्याच्या वाढत्या महागीवर पासवान यांनी केलेला दावा ग्राह्य नसल्याचे हेरत नय्यर थेट न्यायालयात पोहचले आहेत. कांद्याचा काळा बाजार होत असल्याने कांद्याचा तुटवडा भासत असल्याचा दावा पासवान यांनी केला होता.
पासवान यांचा हा दावा म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. कांद्याचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले असताना सरकार त्यावर तातडीने उपाययोजना न करता जनतेची फसवणूक करत आहे, असा आरोप नय्यर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
सध्या कांद्याने सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातून पाणी आणले आहे. देशाच्या विविध भागांत किरकोळ बाजारात कांद्याचा भाव प्रतिकिलोमागे सव्वाशे ते दीडशे रुपयांपर्यंत पोहचला आहे. महाराष्टातील सोलापूरात आणि बंगळुरूमध्ये शनिवारी कांदा 150 रूपये प्रतिकिलोपर्यंत पोहचला आहे. कांदा निर्यातीवर बंदी घालताना कांद्याची आयात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असतानाही अद्याप कांद्याचे भाव नियंत्रणात न आल्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून कांदा गायब आहे.