पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल येत्या २० मे नंतर जाहीर केला जाईल. मात्र, बोर्डाकडून त्यापूर्वीच गुणपडताळणीसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर चौथ्या दिवसांपासून आठव्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहेत. विद्यार्थ्यांना एकूण पाच दिवस गुणपडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर जे विद्यार्थी आपल्या निकालाविषयी असमाधानी असतील आणि ज्यांना गुणपडताळणी करायची असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने गुण पडताळणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सीबीएसईच्या अधिसूचनेनुसार ग्रेडची पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्याची संधी पाच दिवसांसाठी उपलब्ध असेल.
श्रेणीबद्ध उत्तरपत्रिकेची स्कॅन केलेली छायाप्रत निकाल जाहीर झाल्यानंतर १९ व्या दिवसापासून २० व्या दिवसांपर्यंत उपलब्ध असेल. निकाल जाहीर झाल्याच्या तारखेनंतर २४ ते २५ व्या दिवसाच्या दरम्यान उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी उपलब्ध होणार आहेत.
बोर्ड परीक्षा २०२४ दिलेल्या उमेदवारांना गुणांची पडताळणी, मूल्यमापन केलेल्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती प्राप्त करणे आणि उत्तरांचे पुनर्मूल्यांकन करण्याची विनंती करण्याची विशिष्ट प्रक्रिया कळवली जाईल, अशी सूचना सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आली आहे.