पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- मुळशी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजेनेच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांच्या खर्चास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार शासनाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून या योजनेच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने यास मान्यता देताना मात्र अटी घातल्या असून त्या अटींचे पालन करून हे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुळशी तालुका हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. बारामती लोकसभेसाठी मंगळवारी (दि.७) मतदान झाले आहे. त्यानंतर या योजनेच्या कामास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेस मान्यता देताना निवडणूक आयोगाने अटी ठेवल्या आहेत, यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी यांनी मुळशी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे घोषित करावे.
या योजनेच्या कामाचा राजकीय फायदा मिळण्याच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता कालावधीमधे विपरीत प्रसिद्धी होणार नाही, याची दक्षता जिल्हाधिकारी यांनी घ्यावी, असे या निर्णयात म्हटले आहे. या योजनेची निविदा सात दिवसांची काढण्यात यावी आणि योजनेचे काम दि.१८ जून २०२४ पर्यंत पूर्ण करून पाणी पुरवठा सुरु करण्यात यावा,
अशा सूचना शासनाने जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय पाणी पुरवठा विभागाचे कार्यासन अधिकारी प्रविणकुमार पवार यांनी जारी केला आहे.