प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 6 –सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना आता पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे स्पष्ट होत आहे. या बोर्डांच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागल्याने आणि बारावी परीक्षेत चांगले गुण मिळवूनही नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर, सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात कोणतेही अडचण येणार नसल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने म्हटले आहे.
राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील नामवंत महाविद्यालयांनी बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. अशा पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू केली. मात्र, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांनी बारावीचा निकाल उशिराने जाहीर केला. तोपर्यंत बहुतांश महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्जही भरले. मात्र, कमी जागा रिक्त राहिल्याने अनेकांना प्रवेशाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
पुणे विद्यापीठ संलग्नित 50 महाविद्यालयांना 10 टक्के जागा वाढवून दिल्या आहेत. या जागावाढीचे पत्र संबंधित कॉलेजांना पाठविण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारपासून सीबीएसई आणि आयएससीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून, कोणाचेही शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.
– डॉ. संजीव सोनवणे,
प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
रिपाइंचे शिष्टमंडळ कुलगुरूंच्या भेटील
सीबीएसई व आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना कमी जागा मिळत आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेचा आढावा घ्यावा आणि गरजेनुसार महाविद्यालयांना वाढीव जागा द्याव्यात. या जागांवर गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे आणि प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्याकडे केली. यावेळी संघटनेचे ऍड. मंदार जोशी, शैलेंद्र चव्हाण, बाळासाहेब जानराव, डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, असोक शिरोळे, श्याम सदाफुले उपस्थित होते.
90 टक्के गुण, तरीही चिंता
केंद्रीय बोर्डाच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना बारावीत
90 टक्क्यांहून अधिक मिळाले असून, त्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी झगडावे लागत आहे. बऱ्याच महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेची दोन फेरी पूर्ण केली आहे. रिक्त जागांची संख्या कमी आहे. मात्र, चांगले गुण मिळवूनही प्रवेश मिळत नसल्याने पालकांची चिंता वाढली आहे. निकाल वेळेत आला असता, तर त्यांना त्वरित प्रवेश मिळाला असता, असे पालकांचे म्हणणे आहे.