दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा मैत्रीदिन किंवा फेंडशिप डे म्हणून साजरा होतो. जगातील सर्वात सुंदर नातं, मित्रत्वाचं! सखा किंवा मित्र या शब्दाला, नात्याला बहुपदरी आयाम आहे. मैत्रीदिनानिमित्त दरवर्षी कृष्ण-सुदामा, कृष्ण-द्रौपदी, दुर्योधन-कर्ण यांच्या मैत्रीची उदाहरणं आठवतो. इतकी युग लोटलीत पण आजही ती आदर्श म्हणून दिली जातात.
मित्र ही देवाने मानवाला दिलेली विलक्षण भेट आहे. अनेक नाती आपल्याला मिळाली आहेत. यातील काही देैवानं, काही समाजानं, काही जन्मानं मिळाली आहेत. या साऱ्या नात्यांमध्ये सर्वात वरचं आणि उच्चकोटीच नातं असं ज्या नात्याविषयी बोललं जातं ते म्हणजे मैत्रीचं नातं. सखा किंवा मित्र या शब्दाला, नात्याला बहुपदरी आयाम आहे, अर्थ आहे. जगातील सर्वात सुंदर नातं, मित्रत्वाचं! मैत्रीचं नातं जपणं केव्हाही चांगलंच असतं! मित्रत्व ही एक सुंदर कल्पना आहे. या नात्याचं अप्रूप माणसांना तर आहेच पण देवीदेवतांना देखील आहे.
कोणत्याही नात्यात मैत्री जपली पाहिजे. मैत्रीत नातं जोडण्याची आणि जपण्याची आवश्यकता नाही. मैत्रीला लेबल्सची पण गरज नाही! मैत्र या शब्दापासून मैत्री तयार झाली. नात्यात देखील मैत्री जपता येते. कोणत्याही नात्यात मैत्री असली तर समन्वय साधला जातो. मैत्री ही नेहमी साकवाचं म्हणजे पुलाचं काम करते. वयाच्या, स्तराच्या पलीकडे जाते ती मैत्री. विचारांची समन्वयता किंवा समसमान विचारांचीही यासाठी आवश्यकता नसते. कारण या सर्वांच्या पल्याड मैत्री असते. यावरून एक गंमत आठवली. माझ्याच दोन मैत्रिणींची कथा. त्यातून शिकण्यासारखे काही आहे.
दोघी माझ्याच सख्या! दोघींच्या मुलामुलीने आपले लग्न ठरविले. खूप आनंदात पार पडले. नजर लागावी इतका सुंदर सोहळा झाला. मुलाकडचे वेगळे, मुली कडचे वेगळे असे कुठेही वातावरण नव्हते. सारे काही अतिशय उत्साहात आनंदात कार्य संपन्न झाले. लाडाकोडाचे, कौतुकाचे, नव्या नवलाईचे दिवस संपले. दोन्ही मुलं परदेशात रवाना झाली आणि या दोघी मैत्रिणींच्या एकत्र सहली सुरू झाल्या. काही दिवसांनी एकीच्या घरच्याचा फोन वाजला, “आई, आम्ही वेगळे होतोय!’ त्यानेही त्याच्या आईला फोन करून ही बातमी दिली. भारतात दोन्ही घरं हादरली. कोणाचं काय चुकलं याचा विचार करू लागली. एकमेकांची तोंड चुकवू लागली. मनमोकळं करायची हक्काची जागा दोघींनी गमावली. दोघींच्या नवऱ्यांना ही अवस्था बघवत नव्हती. आवडीचे पदार्थ दोघींच्याही घशाखाली उतरत नव्हते.
एका भल्या पहाटे त्यातील एकीला रियलाइज झालं की, अरे नातं तर नंतर जुळलं. मैत्री तर आधीपासूनच होती. ती कशी इतकी कच्ची, तकलादू? मुलांचं काय? तो त्यांचा विचार? आपणच जाऊन बोललं पाहिजे. ती तर पहिल्यापासून अतिशय हळवी आहे. मी तर कणखर आहे ना? ती नवऱ्याला म्हणाली, आपण तिच्याकडे जाऊया का? नवरा हसत होता. प्रेमानं तिला जवळ घेत म्हणाला, “”मी याच दिवसाची वाट बघतं होतो. तिच्याकडेही अशीच परिस्थिती आहे. चल जाऊया, तुझी मैत्रीण वाट बघत असेल.” आलेल्या वादळातही त्यांच्या मैत्रीचा साकव चिरेबंद होता.
अशी कितीतरी निखळ मैत्रीची उदाहरणं देता येतील. इतिहासात, पुराणात, महाभारतात अनेक ठिकाणी मैत्रीची उदाहरणं सापडतात. याच विषयावर मनात आणखी एक विचार प्रकर्षानं जाणवतो. तो तसा नेहमीचा आणि अतिपरिचयाचा विषय! स्त्री-पुरुषांमधील मैत्री! गेल्या कित्येक दशकांमध्ये यावर अतोनात चर्चा झाल्यात. आजच्या मॉडर्न युगातही त्या चर्चा सुरूच आहे. खरं तर आज जग इतकं विस्तारलयं की मुली मुलांच्या बरोबरीनं किंवा त्याहूनही जास्त पुढे आहेत. कित्येक व्यवसायात मुली जास्त दिसतात. अशा वेळी त्यांना स्त्रीमित्रांपेक्षा पुरुष मित्र जास्त असतात. पण तेव्हा त्या मैत्रीची खरंच परीक्षा असते. मित्र आणि प्रियकर या नात्यांमध्ये अतिशय तरल रेषा असते. खरं तर अपोझिट सेक्स मैत्री जास्त हेल्दी असू शकते. मात्र, या लक्ष्मणरेषेचं भान बाळगणे गरजेचं आहे. नवरा आणि मित्र यामध्ये कधीही गफलत करू नये. नाहीतर हे नातं हेल्दी राहात नाही.
याखेरीज मैत्रीदिनाच्या निमित्तानं दरवर्षी आपण कृष्ण-सुदामा, कृष्ण-द्रौपदी, दुर्योधन-कर्ण यांच्या मैत्रीची उदाहरणं आठवतो. आज इतकी युग लोटलीत पण आजही ती आदर्श म्हणून दिली जातात, मानली जातात. आजही द्रौपदीचा सखा कृष्ण म्हणूनच तो सर्वांना परिचित आहे. त्या काळातील द्रौपदी आजच्या स्त्रियांइतकीच प्रगत, तडफदार होती. आपल्या प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी ती कायम झगडत राहिली. आपल्या अधिकारांसाठी, न्यायासाठी तिचे कायम प्रयत्न राहिले. तिच्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे तिने तिचा सखा कृष्णाकडून मिळविलेली आहेत. काही संदर्भ कृष्ण आणि कुंतीच्या नात्याचेही आढळतात. कुंती त्याची आत्या असली तरी ज्येष्ठ सखी होती. त्यांच्या नात्यात मैत्रीचा अनुबंध होता.तोच वारसा कुंतीने आपल्या सुनेला म्हणजे द्रौपदीला दिला. पाच पराक्रमी पती असूनही तिला कृष्णाचं मित्रत्व आवश्यक वाटलं! आणि ते तिने अखेरपर्यंत टिकवलं. दुसऱ्या कोणत्याही भावनांचं अधिकरण त्यांच्या नात्यात नव्हतं!
आजच्या मैत्रीदिनाच्या निमित्ताने हे सारे विचार अनमोल आहेत. मित्र असावाच असावा. कारण, तो एखाद्या भिंतीसारखा आपला पाठीराखा असतो. त्याला आपली सर्व गुपिते माहिती असतात. पण तो ते उघड करीत नाही किंवा त्याचे भांडवल करीत नाही. ज्यांना असे मित्र लाभलेले आहेत ते खरंच भाग्यवान म्हणावे लागतील. असतील असे तर ते प्राणपणानं जपा. नसतील तर असे मित्र जोडा!
अरूणा सरनाईक