बीड : बीडमध्ये येत्या 27 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडणार आहे. त्यांच्या या सभेपूर्वी शेतक-यांच्या विविध प्रश्नांवरून जिल्ह्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई द्या,पीक विमा मंजूर करा या सह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसे मार्फत अंबाजोगाई उप विभागीय कार्यालया समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.या वेळी मनसेने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकार विरोधी प्रचंड घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 27 तारखेला बीड जिल्ह्यात जाहीर सभा पार पडणार आहे. त्यांच्या या सभेपूर्वी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी तर थेट इशारा देत म्हटले आहे की, “कृषी मंत्री बीड जिल्ह्यातील असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय नाही. 27 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी, पीक विमा मंजूर करावा, कोरडा दुष्काळ जाहीर करावा अन्यथा 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपमुख्यमंत्र्याच्या सभेत घुसून काळे झेंडे दाखवणार असा ईशारा मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी दिला आहे.
दरम्यान, 17 ऑगस्ट 2023 रोजी बीड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली होती. त्यानंतर आता शरद पवारांच्या सभेला सडेतोड उत्तर देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात अजित पवारांची जाहीर सभा आयोजित केली आहे.