नवी मुंबई – राज्यात लवकरच ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशा पालकांच्या मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्याक मेळाव्यात दिली.
नवी मुंबईतील वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी अजित पवार यांनी आपल्या भाषणात विविध मुद्दे स्पष्ट केले. नवी मुंबईत रविवारी पार पडलेल्या या मेळाव्यात वक्फ बोर्डबाबत अनेक समस्या असून त्या सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
या वर्षी मुस्लिम समाजाच्या विकासासाठी १५०० कोटींचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विशेष म्हणजे आम्ही सरकारमध्ये सामील झालो असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांबाबत मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार म्हणाले, अल्पसंख्याक लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात मोलाचे कार्य केले आहे. काही लोक मुस्लिम समुदायात भयाचे वातावरण निर्माण करून आपली राजनीती चालवतात. आम्ही सर्व एकसाथ मिळून राज्य करीत आहोत. राज्यातील जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. आम्ही अल्पसंख्याक जनतेचा आदर करतो, त्यांना प्रतिनिधित्व देतो, असेही त्यांनी सांगितले.