– अतुल बोराटे
नांदुर – दौंड विधानसभा निवडणूक म्हटली की धुरळा उडवत जाणारी झेंडे लावलेली वाहने, स्पीकरवरून मावशी तात्या मामा दादा …वर शिक्का अशा दिल्या जाणार्या घोषणा, घरांच्या भिंतींवर चुना निळीने रंगवलेली पोस्टर! नेता व पक्षाला वाहून घेतलेले कार्यकर्ते असे चित्र होते. मात्र हे चित्रच बदलले असून नेते व कार्यकर्ते हटके झाले असून प्रचारही हायटेक झाला आहे. तर निष्ठावंत कार्यकर्ते औषधापुरतेच शिल्लक राहिले आहेत.
वीस वर्षांपूर्वी घराघरांत पक्ष व नेत्यांवरील निष्ठेचे बाळकडू मिळत होते. निवडणूक आली की स्वतःची भाकरी बांधून पदरमोड करून सायकलने, एस.टी.ने अथवा प्रसंगी पायपीट करत कार्यकर्ते प्रचारासाठी जात होते. निवडणूक काळात घरे अथवा सार्वजनिक इमारतींच्या भिंती चुन्याने रंगवल्या जात होत्या. त्यावर निळ्या रंगाने उमेदवाराचे नाव, पक्ष व चिन्ह रंगवलेले असायचे. भिंतीवर जागोजागी खळीने चिकटलेली पोस्टर्स आणि घराघरांवर डौलाने फडकणारे पक्षीय झेंडे असे निवडणुकीचे चित्र होते. मध्येच एखादी गाडी धुरळा उडवत घोषणा देत जात होती.अनेकदा कार्यकर्ते सायकलला झेंडे लावून सायकल फेरी अथवा पदयात्रा काढत होते. कार्यकर्त्यांकडे अपार निष्ठा आणि चिकाटी होती. पांढरीशुभ्र- खादीधारी पुढार्यांऐवजी स्टार्चची अथवा रंगीबेरंगी कपडे व जीन्समधील पुढार्यांची संख्या वाढली आहे.
काळानुसार प्रचाराची संकल्पनाही बदलली आहे. सोशल मीडिया मोबाईल व्हॅनमधून प्रचाराची यंत्रणा राजमान्य व लोकमान्य झाली आहे. त्यामुळे खळ पोस्टर लावणारे कार्यकर्तेही कालबाह्य झाले आहेत. पूर्वी निष्ठेवरून संभाव्य मतदानाची आकडेमोड केली जात होती. मात्र, आता जनताच अंदाज देत नसल्याने आकडेमोड तज्ज्ञांची गरज राहिलेली नाही. बदलत्या युगाबरोबर बदलणार्या निवडणुकीत नव्या पिढीच्या मानसिकतेचे प्रतिबिंबच दिसून येते.
कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, आवडीनिवडी बदलल्या
काळाच्या ओघात धुरळा उडवत जाणारा प्रचार हायटेक बनला आहे. कार्यकर्तेही हटके बनले आहेत. प्रचारासाठी कार्यकर्त्यांना चारचाकी गाड्यांची अथवा पेट्रोल-डिझेलची व्यवस्था केली जाते. पदाबरोबर निष्ठा बदलणार्या नेत्यांप्रमाणे कार्यकर्तेही बदलले आहेत. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, आवडीनिवडी बदलल्या आहेत. त्यामुळे जेवणासाठी हॉटेल्स व धाबे बुक केले जातात. प्रसंगी दाम पदरी पाडून प्रचार करणारा एक वर्ग तयार झाला आहे. परिणामी निष्ठावंत कार्यकर्ते औषधापुरतेच शिल्लक राहिले आहेत.