नांदूर – सामान्य जनतेच्या हातात ही निवडणूक असून, राष्ट्रवादीला दौंड तालुक्यात चांगले वातावरण असून विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. शरद पवार एक मोठे नेते आहेत, त्यांना धोका देणे चांगले नाही. गेली 50 वर्षे ते राजकारणात असून त्यांना जनतेची नाळ माहीत आहे, असे प्रतिपादन माजी आमदार रमेश थोरात यांनी केले आहे.
थोरात आज (दि. 19) रोजी यवत येथे ग्रामपंचायतीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्या निशा शेंडगे, माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, रामदास दोरगे, सरपंच रझिया तांबोळी, उपसरपंच भाऊसाहेब दोरगे, लता देवकर, समीर दोरगे, शुभम दोरगे, सोमनाथ कऱ्हे, दत्तात्रय दोरगे, मंगेश रायकर, संजय शहा, विनायक दोरगे, विकास हाके, शंकरराव दोरगे, सतीश दोरगे, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे आदी उपस्थित होते.
थोरात बोलताना पुढे म्हणाले की, एकाच घरात 25 वर्षे आमदारकी आहे. खुटबाव (ता. दौंड) या गावात 36 कोटी रुपयांची कामे केल्याचे बोर्ड लागले आहेत. मात्र, प्रत्यक्षात एकही रुपया आला नसल्याचा दावा यावेळी बोलताना केला आहे. दौंडला जाणारे रस्ते पाहिले तर एकही रस्ता नीट नाही. या सरकारने येथील जनतेची फसवणूक केली असून, पंधरा लाख रुपये खात्यात जमा करण्याचे गाजर दाखवले आहे. त्यामुळे या सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका, असा आरोप थोरात यांनी यावेळी केला. भीमा कारखान्याबाबत थोरात म्हणाले की, साखर कारखान्याची अवस्था बिकट आहे.
कामगारांचे सव्वीस महिन्यांचे पगार थकले आहेत. 50 कोटींच्या ठेवी आहेत, तर 50 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. मात्र, सभासदांना साखर मिळत नसल्याची टीका राहुल कुल यांचे नाव न घेता रमेश थोरात यांनी यावेळी केली.