मुंबई : राज्यातील असंवेदनशील मंत्री अन् सरकारमुळे शेतकऱ्यांसोबत गोरगरीबांची दिवाळी अंधारात जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केली आहे. एकनाथ खडसे हे जळगावात त्यांच्या निवासस्थानी आले होते, यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर टीका करत, “आनंदशिधा वाटपाची शासनाने घोषणा केली, मात्र त्याच्या वाटपातही घोळ सुरु आहे, तर काही ठिकाणी त्याचा काळाबाजार असल्याचे सुरु आहे, अनेक गोरगरीबांना आनंदशिधा मिळालेली नाही, एकीकडे लाभ द्यायचा म्हणता, आणि दुसरीकडे तो लाभ मिळू नये अशी व्यवस्था सरकारने केलेली दिसते, अशी टीका एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर केली आहे.
तसेच शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळालेला नाही, तर दुसरीकडे अतिवृष्टी झालेली असताना कृषीमंत्री कुठे अतिवृष्टी झाली असे वक्तव्य करतात त्यामुळे मंत्र्यांना, सरकारला कुठलीही संवदेनशीलता नाही, आणि यामुळे यंदा शेतकऱ्यांची , गोरगरीबांची दिवाळी अंधारात असल्याचं सांगत एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
जळगाव जिल्हा दूध संघात पोलिसांकडून चौकशी करण्यात आली, यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे, पोलीस हे जिल्हा दूध संघातील चोरीची चौकशी करताहेत की, संपूर्ण पाच वर्षांच्या कारभाराची चौकशी करत आहे, हे कळत नाहीये. मात्र ट्रकभर लागो की, दहा ट्रक कागदपत्रे लागो ती आम्ही द्यायला तयार आहे असे मत एकनाथ खडसे व्यक्त केले आहे.
खडसे म्हणाले, आम्ही जी तक्रार त्याचा गुन्हा दाखल केलेला नाही, असे असतांनाही पोलीस चौकशी करत आहे, याबाबत राजकीय दबावातून पोलीस छळ करत आहे, न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलिसांनी आम्ही दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केलेला नाही, त्यामुळे न्यायालयाचा अवमान केला म्हणून पोलिसांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.