पुणे (बारामती) – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवान घडामोडी घडताहेत. अशात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार हे क्रिकेटसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी आणि भाजप नेते एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि राजकीय वर्तुळात याची वेगळीच चर्चा सुरु झाली. आता स्वतः पवार यांनी याबाबत खुलासा केला आहे.
बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधत शरद पवार यांनी आशिष शेलार यांना पाठींबा का दिला याचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, जे लोक राजकारण करीत आहेत त्यांचं ते अज्ञान आहे..काही ठिकाण अशी असतात त्यात राजकारण आणायचे नसते असं म्हणत पवारांनी ते बीसीआयचे अध्यक्ष असतानाच किस्सा देखील सांगितला.
पवार म्हणाले,जेव्हा मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो त्यावेळी गुजरातचे प्रतिनिधी मोदी होते, मोदी माझ्या मिटींगला हजर राहायचे. दिल्लीचे प्रतिनिधी जेटली होते, तर सध्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ते ही हिमाचलचे अध्यक्ष होते. मी देशाचा अध्यक्ष आणि बाकी राज्याचे अध्यक्ष आम्ही सर्वांनी एकत्र काम केलं आहे. यावेळी त्याची चर्चा सुरू आहे. आमच्या लोकांचे काम हे खेळाडूंना सुविधा देण्याचे काम आहे. बाकी गोष्टीत आम्ही लक्ष देत नाही असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
“सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर अशा अनेकांनी उभं आयुष्य क्रिकेटला दिल खेळाडूंच्या ज्ञानाचा उपयोग नवीन खेळाडू निवडणं आणि त्यांना तयार करणं यासाठी व्हायला हवा. हे काम त्यांचं आहे. त्यांना उद्या स्टेडियम बांधायचं काम जमणार नाही.ते काम आमचं आहे. कोणते खेळाडू निवडायचे हे काम त्यांचं आहे”, अशा स्पष्ट शब्दांत शरद पवारांनी यांनी आपली बाजू यावेळी मांडली.