-अरूण गोखले
आपल्या संस्कृतीमधला सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीचा सण हा खरा तर एकूण सहा दिवसांचा असून त्याची सुरुवात वसुबारसपासून होते.
भारतीय संस्कृतीत कृतज्ञता या जीवनमूल्याला मोठे महत्त्व आहे. आपला देश हा पूर्वीपासून कृषिप्रधान देश. गाई, म्हशी, गुरं, वासरं, बैल ह्यांना आपण पशूधन मानतो. शेतकऱ्याच्या लेखी असे पशुधन हे लाख मोलाचे असते. तो त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. त्यांची निगा राखतो. त्यांच्याविषयी मनात कृतज्ञता बाळगतो. ती कृतज्ञता करण्याचा हा दिवस.
अश्विन कृष्णद्वादशी म्हणजेच गोवत्सद्वादशी, अर्थात वसुबारस. वसुबारसेच्या दिवशी संध्याकाळी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर तिला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून गाईच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. तिला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गोडाचा नैवेद्य खाऊ घालतात. तसेच गायवासरांना बाजरी आणि गुळाचा घास भरवतात.
आपल्या घरात दूधदुभत्याला वाण पडू नये. मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करायची हा या मागचा भाव आहे. आपण गायीला गोमाता म्हणतो. ही गोमाता वंदनीय आणि पूजनीय आहे. ह्या गोष्टी लक्षात घेऊन वर्षातल्या या खास दिवशी गोधनाची पूजा करतात. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, “ज्याचे घरी गाय। तेथें विठ्ठलाचे पाय।।’
धनत्रयोदशी
दिवाळीच्या आनंदोत्सवाचा हा दुसरा दिवस. या दिवशी तिन्ही सांजेच्या म्हणजेच लक्ष्मी दारी येण्याच्या वेळी घरातील धनाची पूजा करण्याची प्रथा आहे. आपल्या धरातले धन अर्थात सोने-नाणे, नाना अलंकार आणि आभूषणे रूपी धनलक्ष्मी या दिवशी पूजायची असते.
लक्ष्मीच्या पूजेसाठी हा दिवस आणि दारी लक्ष्मी येण्याची वेळ ही ठरवून ठेवलेली आहे. देवघरात ह्या सर्व वस्तू मांडायच्या त्यांची गंधाक्षता फुलांनी पूजा करायची. धूप, दीप, निरांजन लावायचे. लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करून “हे लक्ष्मी, तू माझ्या घरात या रूपांनी अखंड निवास कर’ अशी प्रार्थना करायची असते. या धनलक्ष्मीला धने गुळाचा नैवैद्य दाखवायचा असतो.
काही घरांतून लक्ष्मी घरात कायम राहावी म्हणून तिच्या सोबतच या दिवशी विष्णू, लक्ष्मी, गणेश, नाग या देवतांचीही पूजा करतात. धनलक्ष्मी पूजेचे महत्त्व सांगणारी एक कथा व्रतवैकल्यांच्या कहाणी पुस्तकात आहे. या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावला जातो. याला “यमदीपदान’ असे म्हणतात. इतर कोणत्याही दिवशी दिव्याचे तोंड दक्षिणेकडे करीत नाहीत.
देव आणि दानव ह्यांनी केलेल्या सागरमंथनातून “धन्वंतरी’ नावाची देवता प्रगट झाली, ती याच दिवशी. म्हणूनच या दिवसाला “धन्वंतरी जयंती’ असेही म्हटले जाते. या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक तुकडे व साखरेचा प्रसाद वाटतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी ही अमृत्व देणारी देवता आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने रोज खावी असे मानले जाते.