-अमित डोंगरे
रोहित शर्माला काही वर्षांपूर्वी ज्यांनी पाहिले असेल ते आताच्या त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आश्चर्यच व्यक्त करतील. अफाट गुणवत्ता असलेला पण अत्यंत बेदरकार स्वभावाचा हा खेळाडू अचानक गृहस्थ वाटू लागला. त्याच्या स्वभावात, वर्तनात तसेच त्याच्या बोलण्यातील तो ऍटिट्यूड, ऍरोगन्स सर्वकाही मावळले व समोर आला एक अत्यंत जबाबदार खेळाडू.
त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने यंदाची आयपीएल स्पर्धा जिंकून विक्रमी पाचवे विजेतेपद साकार केले. विजेतेपदाचे जितके महत्त्व आहे, त्यापेक्षा कितीतरी पट महत्त्व रोहितच्या नेतृत्वाचे व त्याच्या कामगिरीचे आहे. या स्पर्धेने 13 वर्ष साजरे केले व त्यात रोहितच्या वर्तणुकीतही अमुलाग्र बदल झाला.
पूर्वी माध्यमांशी बोलताना, सहकारी खेळाडूंशी संवाद साधताना तो घमेंडी वाटायचा आता तो महेंद्रसिंग धोनीकडून कॅप्टन कुलचा वारसा घेतल्यासारखा वागताना दिसतो. त्याच्यातील हाच बदल सर्वांना अपेक्षित होता.
एकेकाळी तो केवळ खेळाडू म्हणून किती यश मिळवेल असे विचारले जात होते, आता त्याच्या नेतृत्वाखालील संघाचे वर्चस्व पाहिले की रोहितला मागे टाकणारा कोणी खेळाडू मिळेल का, असे विचारले जाते, यातच त्याची कर्तबगारी दिसून येते. यंदाच्या स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला सुरुवातीला अपयशाचा जरी सामना करावा लागला असला तरीही त्यानंतर त्यांनी स्पर्धेत दिमाखात पुनरागमन केले. नुसतेच केले नाही तर थेट स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले. गेल्या वर्षीही हा करंडक त्यांनी पटकावला होता, यंदा ते आपल्याकडेच राखताना विक्रमही साकार केला. यंदाच्या स्पर्धेत एक फलंदाज म्हणून रोहित फारसा यशस्वी ठरला नव्हता. मात्र, ही कसर त्याने अंतिम सामन्यात भरून काढली.
एक खांबी तंबू असल्यासारखा तो या सामन्यात उभा राहिला. महान फलंदाजाचे हेच महत्त्व असते की तो नुसता खेळपट्टीवर उभा राहिला तरीही समोरच्या संघाच्या खेळाडूंमध्ये धडकी भरते. पूर्वी हे सचिनच्या बाबतीत होत होते आज रोहितच्या बाबतीत होत आहे. आयपीएल, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय, टी-20 तसेच कसोटी क्रिकेटमध्ये मिळून रोहितच्या नावावर जवळपास 21 हजार धावा आहेत. त्याची धावांची भूक दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी त्याचे पाय जमिनीवर राहात नव्हते आज त्यालाच डाऊन टू अर्थ म्हटले जाते. त्याचा खेळ शैलीदार आहे हे सगळेच म्हणतात, पण त्याच्या ऍटिट्युडमुळे त्याच्यावर स्तुतीसुमनांपेक्षा टीकाच जास्त होत होती. त्याने कसोटीतही आपला दर्जा सिद्ध केला व तेव्हापासूनच त्याच्याकडे परिपूर्ण खेळाडू म्हणून पाहिले जाऊ लागले.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पहिल्या सामन्यापासूनच महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांच्याकडे यशस्वी कर्णधार म्हणून पाहिले गेले. मात्र, खरे यश मिळवले ते या मुंबईकरानेच. माजी कर्णधार सौरव गांगुलीला दादा म्हणतात त्यामुळे त्याच्या वर्चस्वाला दादागिरी असेही संबोधले गेले. मात्र, आयपीएल स्पर्धेतील रोहितची कामगिरी सर्वांपेक्षाही सरस आहे. त्यानेच खरेतर गांगुलीचा यशस्वी नेतृत्वाचा वारसा या स्पर्धेत जपला, पुढे नेला त्यामुळेच आता भारतीय क्रिकेटमध्येही रोहितची दादागिरी निर्माण झाली असे म्हणावे लागेल.
या स्पर्धेदरम्यान भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवड झाली होती, त्यात रोहितला दुखापत झाल्याने संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यावरून प्रचंड वादही निर्माण झाले होते. रोहितवर अन्याय होत असल्याचे बोलले गेले व अखेर त्यानेच मुंबई संघाच्या सरावात सहभागी होत आपण तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर निवड समिती जागी झाली व रोहितशी चर्चा करून त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीच संघात स्थान देण्यात आले. त्याच्या दुखापतीचे स्वरूप फारसे गंभीर नसले तरीही मर्यादित षटकांच्या सामन्यात त्याला पुन्हा दुखापत होण्याचा तसेच मुळात झालेली दुखापत बळावण्याचा धोका पत्करण्याची तयारी बीसीसीआयची नव्हती त्यामुळेच त्याला केवळ कसोटीसाठी संघात स्थान मिळाले.
अर्थात, संघात स्थान मिळाले असले तरीही रोहितच्या मनातील निवड समिती व बीसीसीआयने केलेल्या अन्यायाची भावना संपुष्टात आली नव्हती. त्यामुळे त्याने हा सगळा राग अंतिम सामन्यात दिल्ली संघाविरुद्ध प्रत्यक्ष सामन्यातच काढला. त्याने वादळी 68 धावांची खेळी केली व मी काय चीज आहे हेच दाखवण्यासाठी अत्यंत जिद्दीने खेळी केली. त्याच्याच खेळीच्या जोरावर मुंबईने या स्पर्धेचे पाचवे विजेतेपद मिळवत इतिहास रचला. आता त्याच्या भारतीय संघातील निवडीवरून सुरू झालेले कवीत्व संपले असून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी देखील आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी तो सज्ज बनला आहे. भारतीय संघाचा वर्तमान जरी विराट कोहली असला तरीही भविष्यकाळ मात्र, रोहितच आहे हेच त्याच्या या स्पर्धेतील नेतृत्वाने सिद्ध झाले आहे.