पिंपळे गुरव – दापोडी परिसरातील बहुतांश रस्ते मागील काही महिन्यांपासून रखडले आहेत. त्यामुळे दापोडीतील रहिवाशांसह वाहनचालकांचे हाल होत आहेत. दापोडीतील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता देखील खडतर बनला आहे. त्यामुळे येथील रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राज आल्यापासून शहरातील बहुतांश कामे सुरळीत होताना दिसून येत नाहीत. शहरात व उपनगरांमध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. परंतु महापालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना कर भरून देखील सोयीसुविधा मिळताना दिसून येत नाहीत. दापोडीतील स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग खड्डे, चढउतार यांनी खडतर बनला आहे. त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या रस्त्याने ये-जा करताना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रात्रीच्या वेळी रस्त्यातील खड्डे दिसून येत नाहीत. त्यामुळे दुचाकींना अपघात घडत आहेत. तसेच वाहनातून जाताना ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिकांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच तथागत गौतम बुद्ध विहार या ठिकाणी देखील गेले कित्येक दिवस रस्त्याचे काम रखडले आहे. नागरिकांनी वारंवार मागणी केल्यानंतर प्रशासनाने आता या ठिकाणी कच्चा रस्ता तयार केला आहे. या मार्गाचे देखील डांबरीकरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी होत आहे.
“मागील काही महिन्यांपासून दापोडी परिसरातील रस्त्यांची कामे रखडली आहेत. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी कामे मार्गी लावावीत. अधिकारी वर्ग या कामांकडे दुर्लक्ष करत आहे. टेंडर नाही मग कामे होणार कसे होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे,” असे सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे म्हणाले.