किवळे, (वार्ताहर) – साधारणतः १९८४-८५ च्या सुमारास या स्मशानभूमी चे कंपाऊंड बांधले गेले. तेव्हापासून आजपर्यंत साधी वीटही लावली गेली नाही. त्यामुळे ही कंपाउंड वॉल जागोजागी पडलेली आहे. त्यामुळे यामध्ये इतर श्वापदे व अनाहूत व्यक्ती कुठूनही शिरतात. येथून जवळच ईदगाह मैदान उभारण्यात आले आहे.
या ठिकाणी एक मस्जिद वजा बांधकाम असून त्याठिकाणी पाच हजार समाजबांधव बसतील एवढे मोठे मैदान करण्यात आले आहे. याची निगा राखण्यासाठी या ठिकाणी एक दोन कुटुंबही राहतात. मात्र दफनभूमीकडे कोणाचेही लक्ष नाही. झाडे झुडपे लावून सजावट करण्यात आले आहे. मात्र ती ईदगाह मैदानाच्या अलीकडे आहे.
मुस्लिम दफनभूमीसाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने काही करावे अशी अपेक्षा व्यक्त होत नाही. याउलट आम्ही खंबीर आहोत, आम्ही सर्व करू, अशी भावना आहे. मात्र अंतर्गत दोन गट तयार झाल्याने इथला विकास थांबला आहे. दफनभूमी महामार्गाच्या कडेलाच असल्यामुळे रात्रीच्यावेळी कोणीही आत प्रवेश करून मृतदेह दफन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथून जवळच फासेपारधी समाजाचे अंत्यविधी होत असल्याने दोन्ही समाजात अधूनमधून खटके उडतात. एक दोन वेळा तर पोलिसात तक्रार जाईपर्यंत ही भांडणे वाढली होती. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अंत्यविधी करण्यात आले.
मुस्लिम दफनभूमीत गेल्या पंचवीस वर्षात सीमाभिंतीचे काम झाले नाही. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड किंवा स्थानिक आमदार–खासदारांनी आपल्या निधीतून हे कंपाउंड वॉल बांधून द्यावे. शिवाय दफनभूमीत जागोजाग लाईटची व्यवस्था करावी. – कुदुस खान ( सामाजिक कार्यकर्ते)