सांगवी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येते. परंतु यावर्षी मे महिन्यातील दहा दिवस उलटून देखील शहरातील बहुतांश नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाले, गटारी कचरा, माती यांनी भरलेली आहेत. पावसाळ्यात नाले तुंबल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नालेसफाई प्राधान्याने करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात नाल्यांमध्ये पाणी तुंबू नये, रस्त्यावरचे पाणी लगेच वाहून जावे, यासाठी महापालिकेने नालेसफाई आणि पावसाळी गटारांची सफाई सुरू केली असली, तरी नाल्याची सफाई ऐशीतैशी, तर पावसाळी पाणी वाहून नेणारी गटारे अद्याप कचरा व मातीने भरलेलीच असल्याची परिस्थिती आहे. पावसाळी वाहिन्या आणि गटारांची स्वच्छता करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून नागरिकांच्या घरात व दुकानांमध्ये शिरते. त्यामुळे पावसाळी गटारांची सफाई व्यवस्थित झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आतापर्यंत पावसाळी गटारांची अल्प प्रमाणात स्वच्छता झालेली पाहायला मिळते. पिंपळे गुरव व नवी सांगवीतील कवडेनगर, विनायकनगर, चिखली, कुदळवाडी, रावेत, पिंपरी कॅम्प आदी परिसरातून नैसर्गिक नाले जातात. तसेच संरक्षण विभाग व साई चौकातून आलेले नाले पुढे पवना नदीला जाऊन मिळतात. या नाल्यांची हवी तशी स्वच्छता न झाल्याने या नाल्यांच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी तुंबते. त्यामुळे पावसाळ्यात नेहमीच नागरिकांच्या घरात पाणी शिरते.
वर्षभर पावसाळी गटारे व नाल्यात राडारोडा, कचरा, प्लॅस्टिक, भंगार व टाकाऊ साहित्य जमा झालेले पाहायला मिळते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून ते घर व दुकानांमध्ये पाणी शिरते. तसेच, रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडी होते. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाकडून उपाययोजना करून तात्पुरती कार्यवाही केली जाते.
कमी वेळात जास्त प्रमाणात होणारा पाऊस हे पाणी तुंबण्याचे कारण असले, तरी पावसाळी गटारांची स्वच्छता करण्याकडे महापालिकेचे होत असलेले दुर्लक्ष हेही तेवढेच महत्त्वाचे कारण आहे. अनधिकृत बांधकामे, अशास्त्रीय पद्धतीने होणारे रस्ते खोदकाम, सिमेंट रस्त्यांचा अट्टाहास, पावसाळी गटारे आणि वाहिन्यांची अपुरी संख्या ही कारणेही पाणी तुंबण्यास जबाबदार आहेत.
संरक्षण विभागाच्या हद्दीतून आलेला नैसर्गिक नाला निळू फुले नाट्यगृहापर्यंत आल्यावर तो गणेश सहकारी बॅंकेकडून काटकोनात वळविण्यात आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नाल्याच्या तोंडावरच राडारोडा अडकतो. त्यामुळे वरून वेगात येणारे पावसाचे पाणी अडून विनायकनगर भागात चेंबरमधून पाणी बाहेर पडून घरांमध्ये शिरते. महापालिका प्रशासनाने लक्षपूर्वक नाल्यांतील राडारोडा काढावा.
– शिवाजी पाडुळे, माजी स्वी. नगरसेवक
पावसाळ्यापूर्वी सर्व पावसाळी गटारांच्या चेंबरची झाकणे उघडून त्यामध्ये साचलेला कचरा बाजूला करण्याची गरज आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक कामे झालेली असल्याने पावसाळी गटारे सिमेंटयुक्त राडारोडा, झाडांची पाने, माती, प्लॅस्टिकने भरलेली आहेत. महापालिका प्रशासनाकडून काही ठिकाणच्याच पावसाळी गटारांची झाकणे उघडून स्वच्छता केली जाते. इतर पावसाळी गटारांचीही अशीच स्वच्छता यंदा तरी करण्याची आवश्यकता आहे.
– राजू सावळे, मनसे शहर उपाध्यक्ष.ृ