बारापैकी सहा ते सात मतदारसंघांत वेगवेगळे अंदाज
नगर – जिल्ह्यातील बारापैकी नऊ विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेली चुरस अन् मतदानाची आकडेवारी यावरून आता चर्चा रंगल्या आहेत. सोमवारी दुपारपासून हवा कोणाची, याचा अंदाज घेऊन राजकीय पंडित संभाव्य विजेत्याबाबत दावे-प्रतिदावे करू लागले. मात्र, संध्याकाळी मतदान संपल्यावर निकालाचा अंदाज व्यक्त करण्यात सारेच जर-तरची भाषा करू लागले. त्यामुळे चुरशीच्या सहा ते सात मतदारसंघात आता उलथापालथ होणार की या मतदारसंघात पक्षाची 2014 ला होती तशी स्थिती कायम राहणार, याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत.
कर्जत-जामखेड या सर्वाधिक चुरस असलेल्या मतदारसंघात नाराजांची भूमिका, मतविभाजन, मतदानाची टक्केवारी यावरून अटीतटीची लढत झाल्याचे स्पष्ट होते. या लढतीमध्ये भाजप आपला मतदारसंघ कायम ठेवते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या मतदारसंघात तब्बल 73.98 मतदान झाले आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ पण यंदा राष्ट्रवादीने चांगलीच उचल खाल्ली आहे.
या मतदारसंघात कर्जत तालुक्याचे मतदान निर्णायक ठरणार असल्याचे संकेत आहेत. पारनेरमध्ये 70.23 टक्के मतदान झाले आहे. ते मतदान प्रस्तावितांविरोधात असल्याचे बोलले जात आहे.त्यांची मने जुळविण्याचा प्रयत्न केला खरा पण ते मनाने कधीच त्यांचे झाले नाही. त्यांनी दुसऱ्यालाच प्रसंती दिल्याची चर्चा आहे. मतदारांशी केलेल्या चर्चेतूनही राष्ट्रवादीचे पारडे जड झाले की शिवसेना आपला गड राखणार.
नेवासे मतदारसंघात जिल्ह्यात सर्वाधिक 80.7 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात पडणार याबाबत जोरदार चर्चा आहे. यावेळी राष्ट्रवादी एकसंघपणे लढली तर भाजप व शिवसेनेतील अंतर्गत घुसपुस मात्र कायम राहिली आहे. नगर शहरात सार्वत कमी 58.28 टक्के मतदान झाले आहे. त्याचा फटका कोणाला बसणार याबाबत उलटसुलट चर्चा आहे. पावसाळी वातावरणामुळे मतदान घराबाहेर पडलाच नाही. आपण मतदान नाही केले तरी भैय्याच येणार असे म्हणून मतदान करणे टाळले. पण कोण भैय्या येणार हे मात्र कोणी सांगत नाही. त्यामुळे मतदारांचा कौल काय असेल, याबाबत सारेच संभ्रमात आहेत.
मतदान संपल्यानंतर हवा कोणाची, या आधारावर अंदाज बांधले जात असले तरी लोकसभा निवडणुकीत न दिसलेल्या मात्र प्रत्यक्षात उमटलेल्या मोदी लाटेचा या निवडणुकीवर झालेला प्रभाव, भाजपने केलेला शिस्तबद्ध प्रचार या सर्वांमुळे भाजपच्या मतांमध्ये भरच पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अंदाज कितीही व्यक्त करण्यात आले तरी मतदाराच्या मनात काय आहे, हे गुरुवारी दुपारपर्यंत स्पष्ट झालेले असेल. सध्या तरी अंदाज-अंदाजमध्येच दोन दिवस राजकीय वातावरण तापलेलेच राहणार आहे.